खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांत मिळून एकूण ९७.४१ टक्के म्हणजे २८.३९ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ९९.८३ टक्के म्हणजे २९.१० अब्ज घनपूट पाणी धरणसाखळी प्रकल्पात होते, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी रात्रीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शनिवार सायंकाळी पाच वाजल्यापासून या धरणातून मुठा नदीत २ हजार १४० क्युसेक वेगाने सोडण्यात येत असलेले पाणी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. चारही धरणांत २८.३९ अब्ज घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे.