गेल्या 4 महिन्यांपासून हिंसाचारात धुमसणाऱ्या मणिपूरच्या समस्येवर शांततेच्या मार्गाने तोडगा काढणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी दिली. स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्याहून देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत,मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान मोदींनीसलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये आणि देशाच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. माता-भगिनींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरसोबत असून तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढण्यात येणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील अशा ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. देशात अनेक ठिकाणी आज नैसर्गिक संकट आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात सर्व भारतीयांचं मोठे योगदान आहे. गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आहे. या घटनेचा प्रभाव पुढील 100 वर्षे असणार आहे. भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. भारत स्टार्टअपमध्ये जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे आता आपल्याला थांबायचे नाही. आता द्विधा स्थितीत राहायचे नाही. पुढील हजार वर्षाची दिशा निश्चित होणार आहे. तंत्रज्ञानात भारतीयांचा जगात डंका आहे. देश प्रगतीच्या मर्गावर पुढे जात आहे. देशातील तरुणांच्या वाट्याला आज जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते. आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही मागे नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.बदलत्या जगाला भारत आकार देणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोरोना काळातील कामाचा उल्लेख करण्यात आले. कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली आहे. कोरोनानंतर जागतिक समीकरणं बदलली, आता भारताची संधी, त्यामुळे ही संधी सोडायची नाही, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.