आपल्या समाजासाठी आरक्षणाचा आवाज उठवणारे फार कमी लोक होते. त्यांना निवडणुकीत विपरित परिणाम होण्याची भीती होती. परंतु आरक्षणासाठी जनतेने आवाज उठविलाच पाहिजे, असे परखड मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.सत्यशोधक समाजाच्या ४१व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आरक्षणाच्या मागणीसाठी आणि आरक्षणाचा बचाव करण्यासाठी आवाज उठवलाच पाहिजे. मात्र निवडणुकीतील परिणामांच्या भीतीने समाजातील लोक आपली मागणी पुढे मांडण्यासाठी घाबरतात. आजही मी ओबीसींच्या आरक्षणासाठी आवाज उठवत असल्याने माझ्या मतदारसंघात मुद्दाम समस्या निर्माण करणारे लोक आहेत, असे ना. भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ओबीसी समाजाचे प्रमाण 54 टक्के आहे आणि एससी / एसटी 20 टक्के आहेत. हे दोन्ही समाज एकूण 74 टक्के असूनही त्यांना ”कोणीतरी” भीती वाटते, असे भुजबळ यांनी कोणत्याही समाजाचे नाव न घेता सांगितले.