गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या मोहिमेची कृषी विभागामार्फत चित्ररथाद्वारे जिल्हाभरात जनजागृती करण्यात येत आहे. कृषी भवन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या जनजागृती मोहिमेदरम्यान चित्ररथ गावोगावी जाऊन गुलाबी बोंड अळीची लक्षणे, त्याचे नियंत्रण तसेच कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत दृकश्राव्य माध्यमातून प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
सदर चित्ररथ अंकुर सीड्स व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात प्रत्येक गावोगावी फिरणार आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाकरीता शेतात गळून पडलेल्या पात्या, फुले, बोंडे गोळा करून नष्ट कराव्यात व शेत स्वच्छ ठेवावे. बोंड अळीग्रस्त डोमकळया तोडून आतील अळी सहित नष्ट कराव्यात. कापुस पिकात सर्वेक्षणासाठी हेक्टरी 20-25 कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप) लावावेत व त्यात अडकलेले पतंग वेळोवेळी नष्ट करावेत. तसेच शिफारस केलेल्या कालावधीमध्ये योग्य ती काळजी घेवुन कामगंध सापळयामधील ल्युर बदलत राहावे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी फवारणी करतेवेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत जनजागृती चित्ररथामार्फत करण्यात येणार आहे.