लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हटले की जिल्ह्यातील शेतकर्यांची मातृत्वाची बँक अशी ओळख निर्माण झाली आहे. राज्यात अनेक जिल्हा बँका आहेत. त्यात राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या पहिल्या तीन बँकात लातूर जिल्हा बँक आहे. लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विविध योजनेतून मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लातूर बँकेची वेगळी ओळख आहे. बँकेने पारदर्शकता ठेवून अचूक कामगिरी करत अनेक पारितोषिक मिळवले आहेत. बँक विविध योजना राबवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेत आहे. हे करीत असताना बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा ग्राहकांना सेवा देताना विनम्रता विश्वासाहर्ता जपल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असाच एक प्रसंग लातूर जिल्हा बँकेच्या निलंगा मार्केट शाखेत घडला. महाराष्ट्र विद्यालयातील प्राध्यापक यांनी बँकेत 5.50 लाख रुपये भरण्यासाठी गेले होते. चुकून त्यांच्याकडून रोखपाल यांच्याकडे 6 लाख रुपये दिले गेले. मात्र बँकेच्या रोखपाल व्यवस्थापक यांच्याकडे 50 हजार रुपये जास्तीचे आल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ महाराष्ट्र विद्यालय येथे फोन करून प्रा. नाबदे यांना आपल्याकडून 50 हजार जास्तीचे पैसे आले आहेत. ते घेवुन जावा म्हणताच त्यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले.
बँकेचे खातेदार प्रा. नाबदे यांनी बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक होसुरे, रोखपाल भोसले यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. ही जिल्हा बँकेच्या पारदर्शकता विश्वासाहर्ता जपल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याबद्दल जिल्हा बँकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.