पोषक वातावरणाचा लाभ उचलून नाशकातून निर्यातीचा टक्का वाढविण्यावर भर देण्याचा निर्धार अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच विविध औद्योगिक संघटना आणि बँकर्सतर्फे आयात- निर्यात धोरणावर आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारतर्फे आयात-निर्यात संदर्भात नवीन धोरण बनविण्याचे काम सुरू असून विविध क्षेत्रातील उद्योजकांना याबाबत काय अडीअडचणी येतात त्यावर या चर्चासत्रात उहापोह झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला औद्योगिक क्षेत्र परिसरात शांतता प्रस्थापित करण्यास तसेच निर्यात वाढीसाठी आयमा आणि निमा या दोन्ही संस्था हातात हात घालून काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.महाराष्ट्रात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. नाशकातून निर्यातीचा वेग चांगला आहे. निर्यातीच्या बाबतीत नाशिक राज्यात टॉप 5 मध्ये आहे. नाशिक लवकरच टॉप 3 मध्ये कसे येईल या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे,असेही ते पुढे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारचे आयात-निर्यात विषयक धोरण ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार आहे.त्याचा मसुदा तयार करतांना उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा तसेच सूचनांचा त्यात अंतर्भाव करण्यात येईल.त्याच अनुषंगाने आयमाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी निर्यात करताना येणाऱ्या अडीअडचणी आणि निर्यातीबाबतची नाशिकची स्थिती याची तपशीलवार माहिती दिली. 2022-23 या वर्षात 23 हजार कोटींची निर्यात करून नाशिकने या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे.भविष्यात त्यात आणखी 15.5 टक्के वाढ अपेक्षित असून त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलती आणि निर्यात वाढीसाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सुरू असलेल्या योजनांची माहितीही त्यांनी विशद केली.
प्रारंभी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी आयमांची भूमिका स्पष्ट केली.नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. आयमाने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित निर्यात व्यवस्थापक घडवून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. निर्यात वाढीसाठी शासनातर्फे नवीन धोरणासाठी मसुदा तयार करण्यात येत असून त्यात आयमाची मोलाची भूमिका राहणार आहे.त्यासाठीच्या अडीअडचणींचे निरसन करण्यास आयमातर्फे इम्पेक्स पॉलीक्लिनिक सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्याची निर्यात दुप्पट करण्याचा मानस असून यासाठी उद्योजकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पांचाळ यांनी सांगितले. उद्योजकांनी त्यांच्या सूचना व मागण्या लेखी स्वरूपात आयमाकडे पाठवाव्यात.त्याचा समावेश राज्याच्या निर्यात विषयक धोरणाच्या मसुद्यात करण्यास आपण शासनाला भाग पाडू,असेही पांचाळ यांनी नमूद केले
बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक राजीव सौरव तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी.बी. सिंग यांनी त्यांच्या बँकांतर्फे निर्यातीबाबत उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देतानाच आवश्यक ते सर्व सहकार्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आयामाचे रवींद्र महादेवकर यांनी उद्योजकांच्या मागण्यां व अडीअडचणींविषयी माहिती दिली.जीएसटी उपायुक्त जगदीश डोड्डी यांनी जीएसटीबाबतच्या अडीअडचणींवर उद्योजकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निर्यातवाढीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे.कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा देशात अव्वल दहा मध्ये कसा येईल यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.आवश्यकता वाटल्यास त्यासाठी कृषी सल्लागारांचाही सल्ला घ्यावा असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सुचविले.पोस्ट खात्याचे उपाधिक्षक प्रफुल्ल वाणी यांनी पोस्ट खात्याने सुरू केलेल्या डाक निर्यात केंद्राची माहिती दिली. चेंबरचे कांतीलाल चोपडा यांनीही मनोगत व्यक्त केले.
इपेक्स पॉलिक्लिनिक”चा शुभारंभ
आयात निर्यातीबाबतच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यास आयमाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ”इपेक्स पॉलिक्लिनिक”चा शुभारंभ जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाला.यामुळे निर्यातवाढीला मोठ्याप्रमाणात चालना मिळणार आहे.