आपल्या पूर्वजांनी पराकोटीचा संघर्ष करून, रक्ताचे पाणी करून, प्राण अर्पण करून, कारागृहात मरणप्राय यातना सोसून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य पत्करले. परंतु, राज्यकर्त्यांनी मात्र देशभक्तांच्या त्यागाचा, शौर्याचा, बलिदानाचा अपमान करून स्वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्यासाठी सीमेपलिकडून येणाऱ्या अवैध घुसखोरांना अभय दिले आहे. याचा परिणाम म्हणजे आपल्या देशात घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेवढाच देशाचा धोकाही वाढला आहे. असा हा ज्वलंत विषय हाताळून त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या बांधवांना देण्याच्या हेतूने निवृत्त सेनाधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी “बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका” हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एक अभ्यास पुस्तिका आहे. मराठी भाषेत अशा प्रकारचे लिहिले गेलेले हे पहिलेच पुस्तक आहे. म्हणूनच या पुस्तकाला विशेष महत्त्व आहे.
ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी त्यांच्या आयुष्यातील सुमारे साडेतीन दशके सेनादलात राष्ट्ररक्षणार्थ वेचली आहेत. निवृत्तीनंतरही त्यांचा ईशान्य भारताशी संपर्क राहिला आहे. तिथली संपूर्ण माहिती त्यांना आहे. स्वतंत्र हिंदुस्थानच्या राजकीय नेतृत्वाने वेळोवेळी घेतलेले निर्णय आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचे सविस्तर विवेचन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. राजकीय नेत्यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी घुसखोरी या गंभीर विषयाकडे नेहमीच कानाडोळा केला. त्यामुळे आज भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली ? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल. या प्रश्नाचे उत्तर पुढील अनुच्छेदात आपल्याला आढळते.फक्रुद्दीनअली अहमद यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या एका गटाने त्यावेळी असा प्रचार केला की घुसखोर बाहेर काढल्यास काँग्रेस पक्ष आसाम मध्ये आणि संपूर्ण भारतात मुस्लिम मतापासून वंचित राहील. अखेरीस मतपेटीच्या राजकारणाचा आणि फक्रुद्दीनअली अहमद यांच्या नेतृत्वाखाली घुसखोरी समर्थकांचा विजय झाला.
इंदिरा गांधींच्या कार्यकाळात 1983 मध्ये आसाम साठी आयएमडीटी हा घातक निर्बंध मंजूर करण्यात आला. या निर्बंधानुसार एखादा घुसखोर बांगलादेशी आहे का हे सिद्ध करण्याचे दायित्व तक्रार करणाऱ्याचे आहे. हा निर्बंध रद्द करावा अशी ही मागणी या पुस्तकातून करण्यात आली आहे. आसामचे राज्यपाल जनरल सिन्हा यांनी हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींना आसाम मधील अनधिकृत स्थलांतराबाबतचा अहवाल वर्ष 1998 च्या नोव्हेंबर महिन्यात सादर केला. त्यावर त्या वेळच्या राष्ट्रपतींनी किंवा त्या वेळच्या सरकारने कोणतीही कृती केली नाही. सरकारची ही उदासीन वृत्तीच आज राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होण्यास कारणीभूत ठरली आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळेच आपल्या देशाची लोकसंख्या 100 कोटीपेक्षा अधिक झाली असल्याचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी या पुस्तकात स्पष्ट शब्दात म्हटले आहे.
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण झालेली समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेले विद्यमान सरकार दूर करेल अशी आशा व्यक्त केली आहे. सामान्य माणसांनी पोलिसांचे कान आणि डोळे म्हणून काम केले पाहिजे. नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ्री फोन क्रमांक दिला पाहिजे. त्यामुळे नागरिक त्यांच्याकडील बांगलादेशी घुसखोरांची माहिती पोलिसांपर्यंत तातडीने पोहोचवू शकतील. याबाबत त्यांच्या नावाची गुप्तता पाळली गेली पाहिजे. केवळ सरकार आणि सुरक्षादल यांच्यावर सर्व दायित्व टाकून भागणार नाही. असे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सुचवले आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे. वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी, सामाजिक माध्यमे या सर्वांनीच आपले राष्ट्रीय दायित्व म्हणून या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. असे आवाहनही ब्रिगेडिअर साहेबांनी केले आहे.
नागरिकांना मार्गदर्शन करताना ब्रिगेडिअर साहेब म्हणतात, “आपण देशातले साधे नियम पाळत नाही. नियम मोडणे आपल्याला स्वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांशी तुलना करताना त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा यांचा आपण विचार करतो पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात. ते नियम मोडणाऱ्याला, मग तो पुढारी असो अथवा सेलिब्रिटी, त्याला शिक्षा होते. ते न चुकता कर भरतात. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी त्याच्या उलट वागतो. येथे शांतता राखा असे लिहिले असेल तिथे हमखास आपण कलकलाट करतो. येते थुंकू नये असे लिहिलेल्या पाठीवर लाल पिचकार्यांची रांगोळी असते. नो पार्किंगची पाटी असते तिथेच गाड्या आडव्या, तिडव्या लावलेल्या असतात. कृपया रांगेची शिस्त पाळा असे लिहिलेल्या ठिकाणी झुंबड असते. येथे स्वच्छता राखा असे लिहिलेल्या पाटीखालीच कचऱ्याचा डोंगर असतो. म्हणजे नियम हे मोडण्यासाठी असतात अशी आपली धारणा झाली आहे.”
आपल्या बेशिस्तीचे आणि नियमबाह्य वर्तनाचे नेमक्या शब्दात वर्णन करून आपल्या देश बांधवांनी जबाबदार नागरिक बनले पाहिजे अशी कळकळीची विनंती या पुस्तकातून त्यांनी आपल्या सर्व बांधवांना केली आहे. राष्ट्राच्या संरक्षणाचे दायित्व केवळ सरकार, प्रशासन, सैन्य आणि पोलीस दल यांच्यावर नसून ते नागरिकांचेही दायित्व आहे. नागरिकांनी सजगतेने सर्वत्र वावरावे आणि जर कोठे अयोग्य घडत असेल तर त्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी. प्रशासनाने सुद्धा नागरिकांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या तक्रारीची तातडीने नोंद घेतली पाहिजे. राष्ट्रहितापेक्षा अन्य कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. त्यासाठी जनजागृती हा महत्त्वपूर्ण उपायही त्यांनी सुचवला आहे. केवळ परकीय नागरिकांनी केलेली घुसखोरीच राष्ट्राच्या स्वातंत्र्याला बाधा निर्माण करते असे नाही तर व्यापाराच्या हेतूने होणारी घुसखोरी सुद्धा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवते. याकडेही त्यांनी आपल्या देशबांधवांचे लक्ष वेधले आहे. म्हणून परदेशी मालावर बहिष्कार टाकणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.पोलीसदलाचे दायित्व काय आहे त्याचीही चर्चा या ग्रंथात ब्रिगेडिअर महाजन यांनी केली आहे.
थोडक्यात हे पुस्तक समस्या आणि त्यावरील उपाय सांगणारे पुस्तक आहे. तसेच राज्यकर्त्यांनाही या पुस्तकाने सावध करून राष्ट्रघातक कृत्यांना त्यांनी पाठीशी घालू नये अशी कळकळीची विनंती केली आहे. राष्ट्राच्या संरक्षणाचा विचार करता अत्यंत गंभीर असलेला हा विषय ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी या पुस्तकातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच देशातल्या सर्व स्तरातील नागरिकांना उत्तम मार्गदर्शन करणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे शिक्षण देणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असणे नितांत आवश्यक आहे. या हेतूनेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे मूल्य 100 रुपये आहे. सावरकर राष्ट्रीय स्मारकाशी संपर्क (दूरध्वनी 022-24465877) साधून हे पुस्तक बांधवांनी खरेदी करावे असे विनम्र आवाहनही या लेखाद्वारे करत आहोत.