मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे बहुतांश भाग हा ‘अशांत क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात ‘अफ्स्पा’ (लष्कराचा विशेषाधिकार कायदा) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये ३ मे पासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे बुधवारी थौबल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला जमावाने आग लावली. याशिवाय इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत इंफाळ खोऱ्यात झालेल्या निदर्शनांमध्ये ५० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.
मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,१०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर जाळपोळीचे ५,१७२ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात ४,७८६ घरे आणि ३८६ धार्मिक स्थळांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. हिंसाचाराशी संबंधित घटनांप्रकरणी १६९७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर त्यांच्या पथकासह बुधवारी विद्यार्थी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष विमानाने इंफाळ येथे पोहोचले आहेत.
१९ पोलीस ठाण्यांच्या हद्दी वगळल्या
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सात जिल्ह्यांतील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दी या ‘अशांत क्षेत्रा’तून वगळण्यात आल्या आहेत. यात इंफाळ महानगरपालिकेच्या हद्दीचाही समावेश आहे. अशांत क्षेत्रातून वगळलेल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत इंफाळ, लेफेल, सिटी, सिंग्जमई, सेकमेई, लामसांग, पत्सोई, वांगोई, पोरोमपट, हेंगेग, लामलाई, इरिलबुंग, लेमखोंग, थोबूल, विष्णूपूर, नांबोल, मोइरोंग, काकचिंग आणि जिरिबम आदींचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लागू असलेला ‘अफ्स्पा’ १ एप्रिल २०२२ रोजी पंधरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यामुळे पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. राज्यातील बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येमुळे ही स्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. पोलीस आणि आंदोलक यांच्यात मंगळवारी जोरदार धुमश्चक्री झाली होती. यावेळी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला होता.
इंफाळमध्ये सलग दोन दिवस विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. सरकार आणि यंत्रणेच्या विरोधात घोषणा देत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले. ‘इंडिजिनिअस ट्रायबल लीडर्स फोरम’ (आयटीएलएफ) ही संघटना रस्त्यावर उतरली होती.
दोषींना सोडणार नाही – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हत्येप्रकरणी म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. दोषींना सोडले जाणार नाही. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पदावरून हटवा – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबत म्हणाले की, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पदावरून हटविण्यात यावे, राज्यातील लोक गेल्या १४७ दिवसांपासून हिंसाचाराचा सामना करत आहेत, मात्र पंतप्रधानांकडे मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही.