जालना जिल्ह्यातील सराटी गावामध्ये आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांवरती लाठीमार करण्यात आला. तसेच हवेत गोळीबार करण्यात आल्याच्या बातम्या आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आम आदमी पार्टी त्याचा निषेध केला आहे. मराठा आरक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांनी प्रश्न सोडवण्याची मानसिकता ठेवावी. जनतेला अडकवण्याची नव्हे, असे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.
किर्दत पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले ७-८ वर्षे गाजतो आहे. निवडणुकीसाठी सोयीच्या वातावरण निर्मितीसाठी महायुती आणि महविकास आघाडी या दोघांनी या मुद्द्याचा वापर केला आहे. आरक्षणाचा राजकारण हा सोडवण्याचा प्रश्न नसून लोकांना मात्र अडकवून ठेवणे हाच एकमेव उद्देश दिसतो आहे. समित्या तयार करणे, कोर्टात विषय अडकवून ठेवणे, सर्वे चर्चा करू असे आश्वासन देणे या पद्धतीच्या भूमिका घेऊन सत्ताधारी पक्ष हे नेहमीच हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मराठवाड्यातील कुणबी मराठा यांना हा आरक्षणाचा लाभ मिळावा ही मागणी जालना जिल्ह्यातील लोक करीत आहेत. त्यावर उत्तर काढणे राज्य सरकारच्या हातात आहे. तसेच राज्यात व केंद्रात डबल इंजिन सरकार असल्याने एकूण आरक्षण मर्यादा वाढवणे शक्य आहे. त्यातून मुस्लिम, धनगर आदी समाजालाही संविधानानुसार न्याय मिळू शकेल. परंतु हा प्रश्न टांगता ठेवणं, दुसरीकडे मराठा – ओबीसी समाजामध्ये ताण निर्माण करणे अशा पद्धतीच्या भूमिका हे प्रस्थापित राजकीय पक्ष घेत आहेत, असा आरोप किर्दत यांनी केला आहे.
सामान्य जनतेला शिक्षण सुविधा आणि संधी तसेच सरकारी नोकरीच्या संधी अपुऱ्या असल्याने हा प्रश्न आधिक तीव्र होत आहे. संधीच्या अधिक भाकऱ्या थापण्या ऐवजी एका भाकरीत वाटेकरी वाढवण्याचे धोरण प्रस्थापित भाजप राष्ट्रावादी शिवसेना आदी पक्षांचे आहे. शेतकर्याला शेत मालास हमी भाव नसल्याने प्रश्नाचा गुंता वाढत चालला आहे. हा सर्व भाजपच्या जनहीतविरोधी धोरणाचा परिणाम आहे. संधीची खात्री देणारे आपचे राजकारण हाच एकमेव पर्याय आहे. आम आदमी पार्टीने गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागत पुण्यासह विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे, असेही किर्दत यांनी म्हटले आहे.

















