संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज, बुधवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली. यानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या विधेयकाच्या माध्यमातून माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधींची स्वप्नपूर्ती झाल्याचे सोनियांनी सांगितले.
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) मांडले. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले जाईल. लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. हे आरक्षण 15 वर्षे टिकेल. यानंतर संसदेची इच्छा असल्यास मुदत वाढवू शकते. या विधेयकावर आज, बुधवारी संसदेत चर्चा झाली. काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी आहे. माझ्या आयुष्यातील ही एक मोठी गोष्ट आहे.
महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे पहिले विधेयक माझे पती दिवंगत राजीव गांधी यांनी आणले होते.विधेयक तातडीने मंजूर करावे असे सोनियांनी सांगितले. दिवंगत राजीव यांनी आणलेल्या विधेयकामुळेच देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले, ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे पूर्ण होणार आहे. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच देशातील महिला गेल्या 13 वर्षांपासून राजकीय नेतृत्वाची वाट पाहत आहेत. हे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी त्यांनी यावेळी केली.
भारतीय महिलांमध्ये हिमालयासारखा संयम आहे. नव्या भारताच्या उभारणीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. स्त्री कधीही संकटांच्या ओझ्याखाली दबली गेली नाही. कठीण काळात महिलांनी महात्मा गांधी, नेहरू आणि पटेल यांची स्वप्ने पुढे नेली. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व हे त्याचे उदाहरण आहे. यासोबतच जातींची जनगणना करून एससी/एसटी/ओबीसी आरक्षण द्यावे. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलली पाहिजेत अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी यावेळी दिली.