भारताची महत्वाकांक्षी ‘चांद्रयान-३’ मोहिम यशस्वी झाली आणि एका ऐतिहासिक कामगिरीची सुवर्णाक्षरात नोंद झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘मून (विक्रम) लँडर’ ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांच्या दौऱ्यावरून पंतप्रधान भारतात परतले. भारतात आगमन होताच त्यांनी बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. तसेच चांद्रयान-२ ने चंद्राच्या ज्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ हे नाव दिले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
तुम्ही नवीन पिढीचे रोल मॉडेल!
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, तुम्ही नवीन पिढीचे रोल मॉडेल आहात. तुमचे संशोधन आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने हे सिद्ध झाले आहे की, तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करून दाखवता. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणे ही छोटी गोष्ट नाही. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत. तसेच हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा ठरणार आहे. तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते. जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो. आपण ते केले जे यापूर्वी कोणीही केलेले नाही. २३ ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा फिरतोय. टच डाऊनची खात्री झाल्यावर इस्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीच विसरू शकणार नाही. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला.
व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत!
एक काळ असा होता जेव्हा आपली गणना तिसर्या रांगेत व्हायची. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे.