मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभर वातावरण पेटलं, अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत दिला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा
सध्या राज्यभरात मराठी आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजतो आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. आंबड) इथं मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यात. दरम्यान ‘मुलगी झाली हो’ आणि ‘बिग बॉस मराठी ४’ फेम किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले. जरांगे पाटील जे काही बोलत आहेत, ते बोलण्यासाठी ‘जिगरा’ लागतो अशा शब्दात मानेंनी त्यांचे कौतुक केले. शिवाय य पोस्टनंतर होणाऱ्या ट्रोलिंगचीही पर्वा नसल्याचं माने यावेळी म्हणाले.
“माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो. आपल्याला धर्माच्या नावावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकऱ्यावर, मग वारकऱ्यावर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.
मनोज जरांगे पाटील… तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय, रक्त सळसळायला लागलंय, हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकाऱ्यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’
अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्या शेतकर्याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकऱ्यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत ऱ्हानार. आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे. न्याय मिळालाच पायजे. जय शिवराय. जय भीम.-किरण माने.”