पार्श्वगायक व गीतकार यांना जी पारितोषिके मिळतात ती कोणाच्या हट्टामुळे सुरु झाली?
गाण्याच्या रेकाॕर्डवर चित्रपटांच्या कथेतील पात्राऐवजी गायकाचे नाव येणे कोणाच्या गाण्यामुळे सुरु झाले?
पार्श्वगायकांना राॕयल्टी मिळत असल्यास कोणाच्या पुढाकाराने मिळू लागली?
या तीनही प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे लता मंगेशकर !
आज लतादीदी जाऊन दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटला,पण असा एकही दिवस गेला नसेल की आसमंतात त्यांचा स्वर दरवळला नसेल! जिवंतपणीच आख्यायिका होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं आहे,त्या लोकांमध्ये लता मंगेशकर यांचा क्रमांक खूप वरचा असणार !आज जरी लता मंगेशकर आपल्यात नसल्या,तरी त्यांच्यासंबंधित एवढिशीही बाब ही वृत्त वाहिन्यांसाठी आणि वर्तमानपत्रांसाठी अजुनही फार मोठी बातमी असते.संंगीताच्या सुवर्णयुगाचा विचार केला तर लतादीदी या हिंदी चित्रपटसृष्टीच्या कायमच प्रथम क्रमांकाच्या गायिका होत्या.त्या हिंदीत इतक्या व्यस्त होत्या की मराठी चित्रपटांसाठी फार कमी उपलब्ध असायच्या.
आणि लता प्रथम क्रमांकाची गायिका होती हे वाक्य दुसरे तिसरे कोणी नाही तर साक्षात ओ पी नय्यर यांंनीच एका मुलाखतीत म्हटल्यामुळे प्रश्नच मिटला!(वादाचा!) ते म्हणाले होते,”Let me say this once and for all,and remember I am swearing this on my food, –even though I never worked with Lata,I still consider her as the number one singer in India!”
आणि हा प्रथम क्रमांक तिने कधीपासुन टिकवून ठेवला असणार ?1950 पासून !आत्तासारखी जीवघेणी स्पर्धा तेंव्हाही होती.अगदी सुरुवातीला लता शंभर दोनशे रुपये एका गाण्याचे मानधन घेत असताना शमशाद बेगम एका गाण्याचे एक हजार घेत असे .ज्या स्थानावर शमशाद ला पोचायला साठ महिने लागले तिथे लता बारा महिन्यातच पोचली.अंदाज 1948चा,बरसात 1949चा! बरसात च्या अकरा पैकी दहा गाण्यात लताचा आवाज होता.आणि सगळीकडे बरसात च्या गाण्यांची धूम होती.ये तो सिर्फ उनके आनेका आगाज था!एकेका सिनेमात आठदहा गाणे केवळ लताचे असे खूप सिनेमे पुढेयेणारहोते.नागिन,अलबेला,आह,
अनारकली,मदर इंडिया ते आत्ता आत्ता 1994 चा हम आपके है कौन मध्ये अकरा गाणी,तर 1997 च्या दिल तो पागल है मध्ये सुध्दा आठ गाणी लताची होती !काही सिनेमात तर सर्व च्या सर्व गाणी फक्त लताची !दुसरा स्वरच नाही.विश्वास बसत नसल्यास ही यादी नजरेखालून घाला.आम्रपाली ,पुनम,औरत,
पट्टरानी आणि मराठीत वादळ.आठच्या आठ गाणी केवळ लताची!अनारकली मध्ये सी.रामचंद्र यांंनी” जमाना ये समझा के हम पी के आये” हे लताची उचकी असलेले गाणे टाकले,आणि ते गाणे चित्रपटाचे हायलाईट ठरले!आणि त्यावर विख्यात संपादक बाबूराव पटेल यांंनी त्यांच्या वृत्तपत्रात गमतीने लिहिले की लता मंगेशकरने नुसती जांभई द्यायचा अवकाश की सी. रामचंद्र लगेच तिला राग दरबारी म्हणतील आणि ती धून एखाद्या निर्मात्याला खपवतील!
लताने मराठी चित्रपटसृष्टीत जरी फारसे गायले नसले तरी आधी वसन्त प्रभू व नंतर ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतात भावगीते,भक्तीगीते भरपूर गायली.वादळ(1953)हा लता मंगेशकर निर्मित चित्रपट ज्याचे संंगीत वसन्त प्रभू यांचे होते.यातील एका ठुमरीला नागपूरात वन्समोअर मिळायचा!लक्षात घ्या,चालू सिनेमात वन्समोअर!आणि मग पुन्हा ते गाणं दाखवलं जायचं! पुढे साठच्या दशकात काही चित्रपटांना स्वतः लतादिदींनी आनंदघन नावाने संगीत दिलं.”ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी,अखेरचा हा तुला दंडवत,रेशमाच्या रेघांनी आणि शूर आम्ही सरदार आम्हाला ” ही चार गाणी लतादीदी संगीतकार म्हणूनपण किती प्रतिभावंत होत्या हे दाखवायला समर्थ आहेत.नंतर पुढे लतादिदींनी डोलकर डोलकर सारखी कोळीगीतं,ज्ञानेश्वरी शिवकल्याणराजा हे केलं. याचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर होते.असं सगळं सुरु असताना अचानक संत तुकारामांच्या अभंगांसाठी संगीतकार म्हणून श्रीनिवास खळे कुठून आले,हे काय गौडबंगालआहे ते ह्रदयनाथांकडून ऐकण्यात मजा आहे.ते म्हणतात,” दिदी एक दिवस म्हणाली,बाळ,मला आनंदाचे डोही आनंद तरंग ,वृक्षवल्ली आम्हा सोयरी इ.तुकारामांचे अभंग करायचे आहेत पण श्रीनिवास खळेंबरोबर!
मग मी त्याप्रमाणे खळेंना भेटायला गेलो आणि त्यांना तसे सांगितले. त्यावर खळे मला म्हणाले,”ह्रदयनाथ ,तुम्ही स्वतः संगीतकार,दिदींबरोबर ज्ञानेश्वरी तुम्हीच केली,आणि आता म्हणता तुकारामांच्या अभंगांचं संगीत मी करु? सकाळी सकाळी गम्मत करायला तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का?” आणि तेंव्हा खळेंना पटवता पटवता माझी पुरेवाट झाली की अहो दिदींचीच ही इच्छा आहे.”
लताकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारा ओ पी नय्यर सारखा एकमेव सन्माननीय अपवाद वगळता बाकी सर्वच संंगीतकारांनी आपल्या निवडक उत्कृष्ठ संगीतरचना केवळ लतासाठीच राखून ठेवल्या होत्या .अमुक एक गाणे तू संध्या मुखर्जी ला दिलं होतस का या निरुपद्रवी प्रश्नावर सज्जाद उसळून बोलला होता की हम किसी संध्या और सुबह को नही जानते.हम सिर्फ लतासे गँवाते है! लता आणि आशा यांच्याबद्दल आरडीबर्मन म्हणाले होते,लता ही ब्रॕडमन आहे तर आशा म्हणजे गार्फिल्ड सोबर्स आहे ,आॕलराऊंडर!!
काही वर्षांपूर्वी संंगीतकार प्रभाकर जोग यांनी लिहिलेला एक लेख वाचण्यातआला.त्यात ते म्हणतात,”१९६७ मध्ये मला एक सिनेमा करायला मिळाला होता ,”थांब लक्ष्मी कुंकू लावते”.त्यातील दोन गाणी ,शुभंकरोती म्हणा आणि घेऊ कसा उखाणा ही लताबाईंनी गावी अशी इच्छा होती.पण सांगणार कसे?पण माझ्या व्हाॕयलिन वादकाकडून ती त्यांच्या पर्यंत पोचली .होकार आला. रेकाॕर्डिंग ठरलं त्या आल्या .गाणं समजून घ्यायला त्यांना काही मिनिटेच पुरली.शुभंकरोती म्हणा हे गाणं सुंदरच झालं .कोरस म्हणून जी लहान मुले होती त्यांच्या साठी त्यांनी मोठ्या कॕडबरी बोलवल्या.त्यावेळी त्या एका शिफ्ट मध्ये एकच गाणं करायच्या म्हणून त्यांना राहिलेल्या दुसऱ्या गाण्यासाठी दुसरी डेट विचारली .त्या म्हणाल्या आत्ताच करु .आणि घेऊ कसा उखाणा पण रेकाॕर्ड झालंं. आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नव्हते.बिदागीची विचारणा केल्यावर,”छे छे इतक्या गोड गाण्याचे कोणी पैसे घेतात का” असे म्हणून लतादीदी त्यांच्या गाडीत जाऊन बसल्याही!इतक्या थोर गायिकेने दिलेली ही दाद आठवली की आजही डोळ्यात पाणी येतं.”
कलाकाराची कारकिर्द चढउतारानी भरलेली असते. लतादीदी मात्र याला अपवाद म्हणाव्या लागतील.त्यांच्या करीअरचा ग्राफ कधी खाली आलाच नाही.स्वेच्छेने त्यांनी पुढे पुढे गायन कमी केले.तरीही निर्माते त्यांच्यासाठी थांबायला कायम तयार असायचे.इतरांनी गायलेली गाणी नंतर लताच्या आवाजात डब केल्याची चिक्कार उदाहरणे मिळतील,पण लताने गायलेले गाणे काढून इतर कोणाकडून गाऊन घेतल्याची नोंद आढळत नाही. .1983 ची गोष्ट असावी .लताचे परदेश दौरे ही नित्याचीच बाब झाली होती .लताने फिल्मी गायन कमी करायला आणि परदेश दौरे वाढवायला सुरुवात केली होती. पण काही संंगीतकार लताची वाट पहाणार्यांपैकी होते.एलपी म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल त्यातलेच.लता जेंव्हा परदेश दौर्यावरुन परतून रेकाॕर्डिंग ला आली तेंव्हा तिला दुसऱ्या गायिकेच्या आवाजात डब केलेले गाणे ऐकवण्यात आले.एलपी सांगतात ,लता म्हणाली”इतकं छान तर गायले आहे तिने,माझ्या आवाजात पुन्हा कशाला करता?दुसरे गाणे करु या.”
आणि मग दुसरे गाणे रेकाॕर्ड झाले. पहिले गाणे चित्रपटात तसेच ठेवले गेले.ते होते हिरो सिनेमाचे अनुराधा चे तू मेरा जानू है जे पुढे सुपरहीट झाले!म्हणजे दुसरे गाणे जे लताने गायले ते निंदिया से जागी बहार असणार!
सलिल चौधरी म्हणतात ,”लताबरोबर काम करताना मला फक्त आकाशाचीच मर्यादा होती,कोणताही गायक किंवा गायिका तिच्या आसपास सुद्धा फिरकू शकत नव्हते.लता माझ्यासाठी जे गाते त्याचं मुख्य तत्त्व आहे अतर्क्यता!लतासाठी मी ज्या संंगीत रचना सिद्ध केल्यात,त्यापैकी एकाचीही अस्ताई ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचा अंतरा कसा असेल, याचा अंदाजही येऊ शकणार नाही,असे माझे आव्हान आहे (खरच आहे हे !ओ सजना वरुन तुमको पुकारे मेरे किंवा ऐसे रिमझिम मे चा अंदाज आला होता?)तुम्ही जर ते ओळखू शकलात तर मग लता मंगेशकर सारख्या अभूतपूर्व गायिकेने गायलेल्या गाण्यांचे, त्यांच्या चालीचे,
स्वतःचे असे स्वाभाविक मुल्य ते काय राहिलं!”
हेमन्तकुमार म्हणाले होते,”मी किती भाग्यवान आहे की एखाद्या शुष्क कोरड्या शतकात माझा जन्म झाला नाही!लता मंगेशकर ज्या शतकात आहे त्याच सुरेल शतकात मीही आहे”.हेमन्तकुमार यांच्याच सूरात सूर मिसळून आपणही सांगू शकतो,की आज जरी लतादीदी नसल्या तरी त्यांच्या गाण्यांनी आमचं जीवन समृध्द झालेलं आहे.त्या गाण्यांचं वैभव,ती श्रीमंती आमच्याकडे आहे!
अभय कुलकर्णी
9270049979
(लेखक चित्रपट आणि चित्रपटसंगीताचे अभ्यासक आहेत.)