प्रथम वर्षाचे काही विषय अनुत्तीर्ण राहिलेला विद्यार्थी द्वितीय वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण झाल्यास त्याला तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. पण, पहिल्या वर्षातील किमान ५० टक्के विषयात तो उत्तीर्ण असणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील अंतिम निर्णय विद्यापीठात होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालये आहेत. त्यात अभियांत्रिकीचे सात आणि विधीचे तीन महाविद्यालये आहेत. कोरोनानंतर अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावेळी कोरोनात ऑनलाइन परीक्षा पार पडल्या, पण आता ऑफलाइन परीक्षा द्याव्या लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर, प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’चा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यापूर्वीच विद्यापीठाकडे केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासंदर्भात ६ सप्टेंबरला निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.