जिल्हा परिषदेच्या शाळांना ५८१ शिक्षक मिळणार आहेत. जिल्हा परिषदेकडून बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. त्यानंतर पदभरतीला प्रारंभ होणार असून बिंदुनामावलीनुसार अनुसूचित जाती-जमाती, भज-ब आणि खुला, अशा चार प्रवर्गातील तेवढी पदे सध्या रिक्त आहेत.
राज्यातील शालेय शिक्षण विभागाकडून जवळपास ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून सध्या ‘पवित्र’ पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत शाळांवरील शिक्षक पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षांकडून मंजूर करून घेणे अपेक्षित आहे.
त्यानंतर त्यानुसार पवित्र पोर्टलवर तेवढी पदे अपलोड केली जाणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरावा लागणार आहे. शेवटी मेरिटनुसार त्या त्या उमेदवारांना जिल्हा परिषदांच्या शाळांवर नेमणूक मिळणार आहे. खासगी शाळांना मात्र एका पदासाठी पवित्र पोर्टलवरील प्रत्येकी तीन उमेदवारांमधून एकाची निवड करायची आहे. ते तीन उमेदवार शालेय शिक्षण विभागच त्याठिकाणी पाठवणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन एकाची निवड करणे क्रमप्राप्त आहे.