स्टार्टअप उद्योग भारताच्या अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांच्या प्रवासासाठी दिशादर्शक असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप परिषदेला संबोधित करत होते.
केवळ नाविन्यपूर्ण उत्पादन विकासासाठीच नव्हे तर प्रभावी राष्ट्रीय आणि जागतिक ब्रँडिंग आणि विपणनाला अनुकूल ठरेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी संशोधन, संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योगांमध्ये व्यापक समन्वय आवश्यक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.
गेल्या 10 वर्षात कृषी क्षेत्रात 142 हून अधिक डीप-टेक, अर्थात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारे स्टार्ट-अप उदयाला आले आहेत, याबद्दल समाधान व्यक्त करत, या परिषदेत यामध्ये आणखी 60 स्टार्टअप ची भर पडेल, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. देशासमोरील कृषी विषयक प्रश्न हाताळण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून देशातील रोपर, मुंबई, इंदूर आणि खरगपूर या चार आयआयटी खऱ्या अर्थाने एकत्र आल्या आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी ATMAN हा एक अनोखा उपक्रम आहे असे सांगितले, कारण ATMAN भागीदार कृषी स्टार्टअप्स आणि नवोन्मेषासाठी एक वेगळे व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एक टीम म्हणून एकत्र काम करत आहेत, आणि या कार्यक्रमादरम्यान यातील काही तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.
“संभाव्य स्टार्टअप्सना संकल्पना, प्रोटोटाइप विकास, उत्पादन चाचण्या आणि बाजारपेठ प्रवेशासाठी आशादायक कल्पना, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासह, आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आयआयटी मुंबई, रोपर, इंदूर आणि खरगपूर येथील तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रांनी एकत्रितपणे प्रत्येक स्टार्टअपला 50 लाख रुपये, याप्रमाणे एकूण 20 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे.” डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी याकडे लक्ष वेधले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान” या आवाहनाच्या अनुषंगाने चारही तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रे कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की भारतातील कृषी क्षेत्राला हवामान बदल, जमीनीच्या तुकड्या-तुकड्यांची मालकी आणि साधन संपत्तीची मर्यादा यासारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ते म्हणाले की तंत्रज्ञान विषयक योग्य हस्तक्षेप करून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, शेत मालाची नासाडी कमी करण्यासाठी आणि या क्षेत्राची एकूण कार्यक्षमता सुधारण्यासाठी भारत आपल्या कृषी पद्धतींचे आधुनिकीकरण करू शकतो.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुन्हा नमूद केले की, भारताचे पारंपरिक क्षेत्र असलेल्या कृषी क्षेत्रामध्ये तांत्रिक हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, ज्यायोगे या क्षेत्राचे आधुनिकीकरण करून, या क्षेत्रापुढील आव्हानांचा सामना करता येईल, आणि शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करून जागतिक अन्न सुरक्षेवर प्रभावी उपाय शोधता येतील.