आधुनिक रस्ते व पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करत असताना आज वाशिम येथे राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील ३,६९४.५१ कोटी रुपये किंमतीच्या व १३३.८५ किमी लांबीच्या अकोला-मेडशी, मेडशी-वाशिम व पांगरे-वारंगाफाटा भागांच्या चौपदरीकरणाचे वाशिमच्या खासदार भावना गवळी जी, सर्व आमदार, जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले.
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या वाशिम जिल्ह्यात मागील ९ वर्षांत तब्बल २२७ किमी महामार्गांचे जाळे निर्माण करण्यात आले, यामुळे जिल्ह्यामध्ये विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. रस्ते बांधणीच्या माध्यमातून राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधता येतो. यासाठी महामार्गांचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्रातील अकोला ते तेलंगणा राज्यातील संगारेड्डी पर्यंत ४-लेनचा राष्ट्रीय महामार्ग १६१ हा दोन्ही राज्यांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. अकोल्यापासून सुरू होणारा हा महामार्ग महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांना जोडतो, तर पुढे तेलंगणा राज्यातील देगलुर व संगारेड्डी जिल्ह्यांमधून जातो.
एकूण ३ पॅकेजमध्ये विभागित या महामार्गाच्या पहिल्या अकोला ते मेडशी या ४८ किमीच्या आणि १,२५९ कोटी रुपये किंमतीच्या पॅकेज अंतर्गत चार उड्डाणपूल, १० अंडरपास व ८५ कल्व्हर्ट्स आहेत. मेडशी ते वाशिम या ४५ किमी लांबीच्या व १,३९४ कोटी रुपए किंमतीच्या दुसऱ्या पॅकेज अंतर्गत १३ बस शेल्टर, ६-लेन आरओबी व वाशिम शहर बायपासचा समावेश आहे. तसेच पांगरे ते वारंगाफाटा या ४२ किमी लांबीच्या व १०४२ कोटी रुपये किंमतीच्या तिसऱ्या पॅकेज अंतर्गत कयाधू नदीवरील मुख्य पुल, कळमनुरी तसेच आखाडा-बाळापूर शहर बायपासचा समावेश आहे.
या महामार्गामुळे अकोला, वाशिम, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे जोडली जातील. शेगावचे गजानन महाराज मंदिर, अकोल्याचा शाहनूर किल्ला, अंतरिक्ष जैन मंदिर, आठवे ज्योतिर्लिंग औंढा-नागनाथ, संत नामदेव महाराज संस्थान, नर्सी आणि नांदेडमधील तख्त सचखंड गुरुद्वारा यांसारख्या धार्मिक तसेच पर्यटन स्थळांना पोहोचणे सोपे व सुलभ होईल. तेलंगाणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील व्यापाराला चालना मिळेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, कृषी उत्पादनांना बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल.
सदर राष्ट्रीय महामार्ग १६१च्या निर्माण कार्यात ‘अमृत सरोवर’ योजनेंतर्गत सावरगाव बर्डे, झोडगा खुर्द, चिवरा, अमानी, सायखेडा या गावांमधील तलावांचे खोलीकरण करण्यात आले आणि त्यातून मिळालेल्या माती, रेती यांचा वापर रस्तेनिर्मितीसाठी करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणच्या तलावांतील पाणी संचयात १०१७ टीसीएस ने वाढ झाली आहे. तसेच परिसरातील जलक्षमतेतही वाढ झाली आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक पायाभूत सुविधा व रस्ते निर्मितीच्या माध्यमातून वाशिम जिल्हा, विदर्भ, मराठवाडा तसेच एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Post Views: 71