जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ल्यांनंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात मंगळवार रात्री (11 जून) ते बुधवार (12 जून) पर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे, तर पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शोध मोहिमेत अनेक संशयित लोकांना अटकही केली आहे.
जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील हिरानगर येथील सावल भागात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी घरांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. एक दहशतवादी पळून गेला, त्याच्यासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. तर, दुसरी चकमक डोडा येथील चत्तरगाला भागात झाली. येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान पोलीस आणि सुरक्षा दले भदरवाह, डोडा येथे शोध मोहीम राबवत आहेत.
राज्यात रविवारी 9 जून रोजी जम्मूच्या रियासीमधील कटरा येथील शिव खोरी मंदिरातून माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. रियासी बस हल्ल्यातील फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाच्या 11 पथके कार्यरत आहेत.
त्यानंतर मंगळवारी 11 जून रोजी दहशतवाद्यांनी कठुआला लक्ष्य केले होते. येथे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्यात आला. माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दहशतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात मोठी शोध मोहीम राबवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे, तर दुसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. दहशतवाद्यांचा तिसरा हल्ला मंगळवारी रात्री डोडा येथे झाला. येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराच्या चौकीवर गोळीबार केला. यानंतर तेथेही चकमक सुरू आहे. ड्रोनसह, लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान येथे उभे आहेत, संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे येथे लपलेले दहशतवादी इतर कुठेही जाऊ नयेत याची दक्षता घेतली जातेय.