सोलापूर, 31 जुलै (हिं.स.)। जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर पोचला आहे. अद्याप खडकवासला, चासकमान या दोन धरणांतून सोडलेला जवळपास ३० हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. त्या विसर्गामुळे धरण ६० टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत उजनी धरण यंदा काही दिवस अगोदरच ५० टक्क्यांवर पोचले आहे. उन्हाळ्यात तळ गाठलेल्या उजनी धरणात १ जूनपासून तब्बल ६० टीएमसी पाणी जमा झाले आहे. पावसाळा सुरू होऊन आता दोन महिने झाले असून आणखी दोन महिने पावसाळा आहे. त्यामुळे गतवर्षी ६६ टक्क्यांवर थांबलेले धरण यंदा ओव्हरफ्लो होईल हे निश्चित.
उजनी धरणावर सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत-जामखेडसह अनेक एमआयडीसींना, साखर कारखान्यांना व गावांना उजनीचाच आधार आहे. याशिवाय जिल्ह्यातील दीड ते पावणेदोन लाख हेक्टरला थेट उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असून त्यातून सर्वाधिक ४० हून अधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत. त्यातून हजारो हातांना काम मिळाले आहे. पुढील उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही उपसा सिंचन योजना पूर्ण होणार असल्याने धरणातील पाणी त्या जमिनींना देखील मिळणार आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पातळीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते.