शहरातून गायब होणे, फूस लावून पळवून नेणे अशा प्रकारामध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवण्यात आली. आठ दिवसात ८५ जणाचा छडा लावण्यात खाकीला यश आले.यामध्ये ४३ महिला, ३६ पुरुष आणि सहा बालकांचा समावेश आहे.
गायब होणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सात पोलीस ठाणे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अशा आठ पथकांद्वारे आठ दिवसात विशेष मोहिम राबवली. सातही पथकाकडून ८५ जणांचा शोध लावण्यात आला. गायब झालेल्या या सर्वांना त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नातलगांना बोलावून घेऊन त्यांच्या प्रिय व्यक्तींना त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. गायब व्यक्ती पोलिसांच्या मदतीने पुन्हा स्वगृही आल्याने नातलगांनी पोलिसातील माणुसकीबद्दल आभार मानले. पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यांचे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अंमलदारांनी ही कामगिरी केली.