मी शपथ घेतल्याप्रमाणे आमच्या सरकारनं मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सगेसोयऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांची भाषा राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल चुकीची भाषा वापरणं आपली संस्कृती नाही
आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरणं ही आपली संस्कृती नाही. हे मनोज जरांगे पाटील यांना कोणी बोलायला लावतंय का? हे पाहावं लागेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आता आरक्षण दिल्यानंतर विरोधी पक्षाला अपेक्षित नव्हतं की इतक्या लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळं ते टीका करत आहेत. त्यांना वाटलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हिचं त्यांची भावना होती अे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. सरकारनं मराठा आरक्षणासाठी काय केलं नाही ते सांगा. जनता सुज्ञ आहे. तुम्हाला जागा दाखवेल. त्यामुळं आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असे मुख्यमंत्री म्हणाले.
जरांगेंनी वेळोवेळी मागण्या बदलल्या
मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेऊन लढ्यात उतरले होते. पण त्यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी त्यांना भेटायला जालन्याला गेलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे शांततेत ५६ मोर्चे झाले. पण यावेळेस कुठं आग लागली. कुठे दगडफेक झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जरांगे पाटील आता जी भाषा आहे ती राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आमचं सरकार शेतकरी, महिला पायाभूत सुविधांना सरकारचं प्राधान्य देत आहे. मात्र, विरोधकांना राजकारणातच अधिक रस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोणीही कायदा हातात घेऊ नये
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांनी संयम पाळावा. कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाबाबत मोठे निर्णय घेतले. आज धनगर समाज बाबतीत सुद्धा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळं कोणीही संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले.