भारतीय सैनिकांसाठी राष्ट्रभक्तीचा स्फूर्तिदायी उपक्रम -डॉ.गंगाधर तोगरे
देगलूर: भारतीय सीमेवर तैनात जवान देशाप्रती सर्वस्व त्याग करतो.महत्वपूर्ण असलेल्या सण-उत्सवापासून दूर असतो.बहिण-भावांच्या अतूट नात्यांचा ऋणानुबंध जतन करणारा रक्षाबंधन सण आहे.याचे औचित्य साधून भारतीय सैनिकांसाठी राख्या पाठवल्या जातात. राष्ट्रभक्तीचा स्फुर्तीदायी असा उपक्रम दरवर्षी कंधार येथील सुंदर अक्षर कार्यशाळा राबवित असते.असे प्रतिपादन डॉ.गंगाधर तोगरे यांनी देगलूर येथे शुभेच्छा पत्राचे विमोचन प्रसंगी बोलताना केले.
मानव्य विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देगलूर येथे शालेय विद्यार्थीनीच्या वतीने सैनिकांना पाठविण्यात येणाऱ्या शुभेच्छा पत्राचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कंधार येथील सुंदर अक्षर कार्यशाळेचे दत्तात्रय एमेकर यांच्या संकल्पनेतून गत दहा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो.रक्षाबंधन सणा निमित्त बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जाते. हा सण-उत्सव घराघरात साजरा होतो.
परंतु भारतीय वीर सैनिक आपल्या कुटूंबापासून कोसो दुर राहून भारत मातेची सेवा डोळ्यात तेल घालून करतात. कंधार येथील सुंदर अक्षर कार्यशाळेंने मन्याड व गोदावरी खोऱ्यातील शालेय भगीनींचे ३३३३ सदिच्छापत्रे व ३३३३ राख्या अन् सोबत १५ फुटी महाराखी गेली १० दहा वर्षापासून अखंडित देशभक्तीचा उपक्रम शालेय भगींनीच्या हस्ते पत्र लिहून भारतीय सैनिकांना सीमेवर पाठविली जातात.यावर्षी मानव्य विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देगलूर येथे उपक्रमाचा प्रारंभ दि.१८ जूलै रोजी करण्यात आला.त्यावेळी डॉ.गंगाधर तोगरे बोलत होते.
कार्यक्रमास मुख्याध्यापक संतोष कोल्हे,देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे , डॉ.गंगाधर तोगरे ,उपक्रमाचे संकल्पक दत्तात्रय एमेकर, श्याम कोल्हे, पत्रकार राजेश्वर कांबळे, शिवानंद स्वामी , छायाचित्रकार किरण मुधोळकर, सुनील पत्रे,शाळेचे पर्यवेक्षक शरद हांद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मन्याड व गोदावरी खोऱ्यातील स्फूर्तिदायक उपक्रमा विषयी डॉ. गंगाधर तोगरे यांनी देशभक्तीच्या उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली.
यावर्षी मानव्य विकास शाळेची निवड गुणवत्तापूर्ण सातत्य असल्यामुळेच केली आहे.राष्ट्रकूट कालीन कंधारचा हा उपक्रम चालुक्यकालीन देगलूर नगरीत प्रारंभ झाल्यामुळे ऐतिहासिक बनला आहे. सुंदर अक्षर कार्यशाळेचे सुलेखनकार तथा ग्रंथपाल दत्तात्रय एमेकर यांना यांचे श्रेय आहे.असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
देशभक्तीच्या स्फूर्तिदायक अशा उपक्रमात ३०० शालेय विद्यार्थ्यांनीनी सहभाग होण्याचा मनोदय व्यक्त केला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आयोजित विशेष कार्यक्रमात करुन भारतीय डाक विभागामार्फत सीमेकडे सदिच्छापत्र व राख्या आणि १५ फुटाची महाराखी रवाना करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक शिवानंद स्वामी यांनी केले.यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.