जालना, ३० जुलै (हिं.स.) : मंठा शहरातील देवी रोडवर एका भरधाव आयशर ट्रकने शाळेतून घरी जाणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात सीमा चव्हाण (२४), सहा वर्षीय मारिया पठाण आणि ६५ वर्षीय रूपला राठोड यांचा मृत्यू झाला आहे. चार वर्षीय इशिका चव्हाण गंभीर जखमी झाली आहे.अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि चालकाला ताब्यात घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेने मंठा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची अधिक माहिती अशी की, मंठा शहरातील देवी रोडवर शाळेतून घरी जात असताना सीमा चव्हाण आणि तिची सहा वर्षांची मुलगी मारिया पठाण यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक रूपला राठोड यांना भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही मृत्यू झाला, तर इशिका चव्हाण ही चार वर्षांची चिमुकली मुलगी जखमी झाली आहे. इशिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेने मंठा शहरात मोठी खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला असल्याने पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. या भीषण अपघाताने तीन निष्पाप लोकांचे बळी गेल्याने मंठा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.