बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव १२ फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. एनडीएकडे बहुमत असलं तरी माझींनी जदयू भाजपचं टेन्शन वाढवलं आहे.
बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या संयुक्त जनता दल (जदयू) आणि भाजप युतीच्या सरकार विश्वासदर्शक ठरावाला येत्या सोमवारी (दि. १२) सामोरे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या आमदारांचा मुक्काम तेलंगणामधील हैदराबाद शहराजवळ हलविला आहे. हैदराबादपासून सुमारे तीस किलोमीटरवर असलेल्या इब्राहिमपटनम येथे एका रेसॉर्टमध्ये काँग्रेस आमदार थांबले आहेत. ते रविवारपर्यंत (दि. ११) तेथे मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. बिहारमधून रविवारी (दि. ४) सायंकाळी वीस जण हैदराबादमध्ये दाखल झाले. यात काँग्रेसचे १७ आमदारांचा समावेश होता.
इंडिया आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या बिहारमधील ‘जदयू’ने गेल्याच आठवड्यात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली आघाडी तोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर ‘जदयू’ अध्यक्ष नितीशकुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता नितीशकुमार यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे.
बिहारलगतच्या झारखंडमध्ये मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तत्पूर्वी, सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) पक्षाच्या आमदारांनी देखील तेलंगणमध्येच तीन दिवस मुक्काम ठोकला होता.
‘…ही तर अपवित्र युती’
‘जदयू’ अध्यक्ष नितीशकुमार यांनी भाजपच्या दबावाला बळी पडत अपवित्र युतीचे सरकार स्थापन केले, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) नेते मेहबूब आलम यांनी केली. नितीशकुमारांना भाजपने हायजॅक केले आहे. ते भाजपप्रणित ‘एनडीए’ आघाडीमध्ये का गेले, याच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. जनता ते कदापी विसरणार नाही, असेही मत आलम यांनी मांडले.
जीतनराम मांझी यांनी नितीशकुमारांचं टेन्शन वाढवलं
जीतनराम मांझी यांनी त्यांच्या पक्षाला किमान २ मंत्रिपदं मिळावीत, अशी भूमिका मांडली आहे. जीतनराम मांझी यांनी आम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्यांसारखी मंत्रिपदं का मिळत नाहीत, असा सवाल केला होता. जीतनराम मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांना एससी एसटी कल्याण विभाग देण्यात आला आहे. राजदनं मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊनही नितीशकुमार यांच्या सरकारला पाठिंबा दिल्याचं मांझी यांनी म्हटलं.