केंद्रीय मंत्रिमंडळात एकही पद न मिळालेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या नाराज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला 80 जागा मिळाव्या अशी मागणी पक्षाकडून होऊ लागली आहे. शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील 4 जागा, नंदुरबार 2, धुळे 2 याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात 8 जागांची अपेक्षा मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत राज्यातील विजयात भाजप, शिवसेना यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गट 80 जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 4 जागांचा समावेश आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होईल, असे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळांनी 90 जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली होती. तरी किमान 80 जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी असल्याचे पाटील म्हणाले. विधानसभेची तयारी आतापासून करण्यात येणार आहे. शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे असे पाटील यांनी स्पष्ट केले.