वाळूज महानगर (प्रतिनिधी) औद्योगिक परिसराच्या अगदी जवळच असलेल्या जोगेश्वरी गावातील आंबेडकरनगरामधील विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून चिखल तुडवीत शाळेत जावे लागत आहे. सध्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले असून त्या पाण्यावर डासांचा वावर होत आहे. सर्वत्र चिखलमय रस्ता निर्माण झाला आहे. शैक्षणिक धडे घेण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत पण चिखलाचा रस्ता आडवा येतो या रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. निदान शाळेसाठी तरी रस्ता द्या अशी आर्त हाक विद्यार्थी देत आहेत.
दरवर्षी याच रस्त्याने शाळेला जाणार्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात. हा रस्ता वर्दळीचा असून, दुचाकी देखील शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करू शकत नाही कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. वाहनधारकांना तसेच पायी चालणार्या विद्यार्थ्यांना, पालकांना खुप कसरत करत शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागत आहे.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून चालताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.आम्ही शाळेत कसं जायचं? आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकवर्ग करत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
या वसाहतीला कोणीच वाली नाही, आम्ही गेल्या १०-१२ वर्षांपासून आमचा विकास करून घेण्यासाठी धडपड करीत असून, आम्हाला कोणीच साथ देत नाही, निवडणुका आल्या की आमच्या दारावर चकरा सुरू होतात, आश्वासनांचा पाऊस पडतो, निवडणुका संपल्या की साधे ढुंकूनही कोणी पाहत नाही.
या वसाहतीतील कोणताच रस्ता सुस्थितीत नाही, एखाद्या गर्भवती अथवा आजारी व्यक्तीला खाटेवरूनही घेऊन जाणे शक्य होणार नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. आमची लहान मुले, महिला, वृद्ध तापाने फणफणत असून, या परिसरात साथीच्या आजाराने ग्रासले असल्याचे अर्चना शिरसाट, वंदना शिरसाट, मंगल पैठणे, कोमल भालेराव, रेखा कांबळे, शिला वाघमारे, सुमन वाघमारे, सारा अर्नाजलम, अनिता अल्हाट, कल्पना जगताप, कविता वाघमारे, शिला वाघमारे, सोनाली पवार, सोनली गव्हाणे आदी महिलांनी ‘तरुण भारत’कडे तक्रारीचा पाढा वाचला.
_१४ महिन्यापासून मी कार्यरत आहे, या अगोदर कोणताच विकास या परिसरात म्हणावा तसा झालेला नाही, सर्वप्रथम मी या परिसरातील गटार नाल्याचे काम हाती घेतले, त्यानंतर मी रस्ता तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून, त्यानुसार काही भागात मी रस्त्याचे कामही सुरू केले आहे,
आंबेडकरनगर हा शंभर एकरचा गट आहे, सध्या ग्रामपंचायतीकडे बजट नाही, तसेच या परिसरातील नागरिक कर ही भरत नाहीत, जर सर्वच नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे कर जमा केला तर त्याच्या दुप्पट मी या ठिकाणी विकास काम करण्यास तयार आहे. तरीही मी याठिकाणी बरेचसे काम हाती घेतले असून, काही ठिकाणी रस्त्याचे काम झाले तर काही ठिकाणी सुरू आहे._
*योगिता रामेश्वर आरगडे (सरपंच)*