भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मिळालेल्या मताधिक्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने भोकरदन विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस कमिटी येथील बैठकीत केली. काँग्रेसचा पारंपरिक मतदार पक्षाचे केडर या जीवावर या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार सहज विजय होईल, असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठनेते बबनराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, माजी जि.प.सदस्य साहेबराव झोरे, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, अनिल देशपांडे आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर संत गजानन महाराज हॉटेलमध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदेत राजाभाऊ देशमुख यांनी माहिती दिली. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व २८८ मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र काँग्रेस कमिटीकडून संभाव्य उमेदवारांची यादी मागवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भोकरदन येथील काँग्रेस कमिटीत काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत एकमुखाने भोकरदन मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने हा मतदारसंघ महायुतीत काँग्रेसला मिळावा, अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीत १ हजार पेक्षा जास्त या मतदारसंघाने डाॅ.कल्याण काळे यांना मतधिक्य दिले. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसने दावा मजबूत केला आहे.पत्रकारांशी बोलताना राजाभाऊ देशमुख म्हणाले,
भोकरदन काँग्रेस कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संभाव्य उमेदवारीची नावे मागवली आहेत. यावर कार्यकर्त्यांनी मते व्यक्त केली. सर्वांनी एकमुखाने राजाभाऊ देशमुख यांना या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा ठराव केला आहे. महायुतीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा हा आमचा आग्रह असणार आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली.
सातत्याने काँग्रेसचे आमदार या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने भोकरदन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
यावेळी युवा नेते इंद्रजीत देशमुख, सोपान सपकाळ, रमेश जाधव, विष्णू भालेराव, किशोर शिंदे, गौरव देशमुख, रोशन देशमुख, शेख अजीम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
@ मतदार संघातूनच उमेदवारी देण्याचा सूर
सर्वांनी एकमुखाने मला मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा ठराव केला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. मागील दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने भोकरदन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.