लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याच्या एका हार्ट अटॅकने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. आता तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे श्रेयसने सांगितलं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. तो अनेकांचा लाडका अभिनेता आहे. हिंदी सिनेसृष्टीतही तयाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. कित्येक तरुणी तर आजही त्याच्यावर फिदा आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मधून त्याची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढली. मात्र महिन्याभरापूर्वी श्रेयसने सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. श्रेयसला अचानक हार्ट अटॅक आला आणि सगळेच हादरले. त्याला नेमकं काय झालं हेही कळायला मार्ग नव्हता. सगळेच चिंतेत पडले. धावपळ सुरू झाली. त्याला इस्पितळात दाखल करण्यात आलं. चाहते त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करू लागले. तो या मोठ्या संकटातून वाचला. मात्र अगदी निरोगी असलेल्या श्रेयसला हार्ट अटॅक कसा काय आला असा प्रश्न तेव्हा अनेकांच्या मनात येऊन गेला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने त्यामागचं कारण सांगितलं आहे. यासगळ्याची चाहूल त्याला १ वर्ष आधीही लागली होती असं त्याने म्हटलं आहे.
माझ्या शरीराने मला बराच वेळ दिला
श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांनी नुकतीच ‘माझा कट्टा’ वर हजेरी लावली होती. या मुलाखतीत बोलताना श्रेयस म्हणाला, ‘मी ना दारू पितो, ना सिगारेट पितो, ना तेलकट खातो, ना तळलेलं खातो तरीही मला अटॅक आला. मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे होऊ कुणाबरोबरही होऊ शकतं. पण मी फक्त शरीराची काळजी घेत होतो, जेवणाकडे लक्ष देत होतो, व्यायाम होता त्यामुळे माझ्या शरीराने मला बराच वेळ दिला. म्हणजे अटॅक आल्यापासून ते इस्पितळात दाखल होईपर्यत माझ्याकडे जवळजवळ दीड तास होता.
पहिल्यांदा शरीराबद्दल ऑड जाणवलं
हल्ली आपण बघतो की क्रिकेट खेळताना कुणीतरी पडतं, जिममध्ये जास्त व्यायाम केल्याने कुणीतरी पडतं आणि जागेवर जातं. तेव्हा शरीर तुम्हाला वेळ देत नाही. पण मला तो मिळाला. दुसरी गोष्ट अशी की ऑक्टोबर २०२२ मध्ये मला पहिल्यांदा माझ्या शरीराबद्दल काहीतरी ऑड जाणवलं. मला दमल्यासारखं वाटलं. तेव्हाही मी दुर्लक्ष नाही केलं. मी थेट डॉक्टरांना हॉटेलला बोलावलं. २ वेळा ईसीजी करून घेतला. तो नॉर्मल आला. नंतर मी मुंबईला आल्यावर पुन्हा इस्पितळात गेलो. पुन्हा सगळे चेकअप करून घेतले. तेव्हा मात्र थोडा कोलेस्ट्रॉल वाढलेला. त्यावरची औषधं सुरू केली.
माझी फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉन्ग आहे
तिसरी गोष्ट अशी की माझी फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉन्ग आहे. माझे वडील, माझे काका, माझे आजोबा, माझी आत्या सगळेच हार्ट अटॅकने गेले. माझ्या वडिलांना पण झालं होतं पण सुदैवाने ते वाचले आणि औषध उपचार वगरे करून ते पुढचे २० वर्ष ते जगले. पण ४० ते ५० च्या वयात आमच्या घरातल्या बऱ्याच जणांना ते झालंय. त्यामुळे माझ्या डोक्यात कुठेतरी ते होतं की मला काळजी घ्यायची आहेच. माझं काम असं आहे, लाइफस्टाइल अशी आहे. मला बाहेर जावं लागतं खावं लागतं. त्यामुळे हे सगळं झाल्यावर मी आधी म्हटलं चेकअप करून घेऊया.
शरीराकडे दुर्लक्ष झालं
मला कुणीतरी विचारलं की स्ट्रेस खूप होता का? तर स्ट्रेस असा नाही. मी जे चित्रपट करतोय त्यात मी मानसिकदृष्ट्या आनंदी आहे. पण शारीरिकदृष्ट्या हो. सतत कामं असल्याने माझं शरीराकडे दुर्लक्ष झालं. त्यादिवशीही तसंच झालं. ‘वेलकम’ चं शूट होतं. ८- १० किलोचं वेट आमच्या शरीराला बांधलेलं. मी इतर सगळ्यांसोबत मस्ती करत होतो शूट करत होतो. मी अक्कीला (अक्षय कुमार)ला म्हणालो पण की शूट झाल्यावर लारा दत्ताला भिजवूया. असं सगळं सुरू होतं. शूट संपलं. मी व्हॅनकडे चालायला लागलो आणि एक वेगळाच थकवा मला जाणवला.
छाती खूप जड झाली
तो थकवा मी आयुष्यात कधी अनुभवला नव्हता. मी कसाबसा चालत व्हॅन पर्यंत गेलो. कपडे ते ओले बदलले. मी बाहेर येऊन झोपलो. मेकअप मॅनने विचारलं मला काय झालं. मी म्हणालो, काही नाही गाडी आली? तो म्हणाला हो. मी बूट घालायला वाकलो पण छाती खूप जड झाली. मी चप्पल घातली आणि गेलो. गाडीत माझा डावा हात दुखायला लागला. मी विचार केला की ते लटकलो, पडलो म्हणून दुखत असेल. म्हणून मी थेट घरी गेलो. दिप्तीला सांगितलं.