तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोळ केल्याचा दावा काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला. यात मतदार यादीतील अनेक घोटाळे पुढे आणले आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बूथनिहाय मतदार यादीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात पंढरपूर , सांगोला, माळशिरस व मोहोळ येथून करण्यात आली आहे.
सातलिंग शटगार यांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली आहे. मतदार यादीत दुबार मतदान, मतदार यादीतून वगळलेली नावे, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे कमी केली आहे का ? अशा विविध गोष्टींची तपासणी, पडताळणी करावी, असे आदेश काँग्रेसच्या बैठकीत दिले आहेत.
तालुका, गावपातळीवरील नेते, कार्यकर्ते यांच्याकडून बूथनिहाय मतदार यादीची पुनर्तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून ३७ लाख मतदारांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शटगार यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर मुंबई येथे तीन दिवस जिल्हाध्यक्षांची शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षवाढीसाठी जिल्हाध्यक्षांची भूमिका या विषयावर प्रदेश काॅंग्रेसकडून मार्गदर्शन करण्यात आले.