काँग्रेस सध्या जाती-पातीवरुन भाष्य करत आहे. मात्र दलित, मागास आणि आदिवासी यांच्या आरक्षणाला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा विरोध आहे. नेहरुंचा आरक्षणाला विरोध होता, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत नेहरुंनी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले. नेहरूजींनी पत्रात म्हटले होते, मला आरक्षण आवडत नाही आणि विशेषतः नोकरीत आरक्षण नकोच, असा उल्लेख नेहरुंनी या पत्रात केला होता, असे मोदींनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या या संदर्भ आणि विधानावरून राज्यसभेत गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला ते उत्तर देत होते.
बाबासाहेबांना भारतरत्न देण्याच्या योग्य मानले नाही!
मोदी पुढे म्हणाले की, जर बाबासाहेब नसते तर अनुसूचित जाती-जमातीला आरक्षण मिळाले असते की नसते, याचा मी विचार करत आहे. ज्या काँग्रेसने ओबीसींना आरक्षण दिले नाही. ज्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातील गरिबांना आरक्षण दिले नाही. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याच्या योग्य मानले नाही. ज्या काँग्रेसने केवळ त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाच भारतरत्न दिले. तीच काँग्रेस आज आम्हाला सामाजिक न्यायाचा धडा शिकवत आहे. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची हमी नाही, त्यांना आपल्या धोरणांची हमी नाही, तोच काँग्रेस आज मोदींच्या हमीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
काँग्रेस हा पक्ष आता जुना झाला!
या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. आताही तुम्ही काहीही न ऐकण्याच्या उद्देशानेच आला आहात. पण मी देखील यावेळी पूर्ण तयारीने आलो आहे. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. मी मल्लिकार्जुन खरगेजींचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यादिवशी मी त्यांचे भाषण ऐकत होतो. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की, लोकसभेत ज्या मनोरंजनाची उणीव भासत होती ती त्यांनी भरून काढली. त्या दिवशी दोन कमांडो आले नव्हते आणि त्यांनी त्या संधीचा पुरेपुर फायदा उचलला. तुम्हाला पश्चिम बंगालमधून विशेष आव्हान मिळाले आहे. काँग्रेस हा पक्ष आता जुना झाला आहे. हा पक्ष स्वातंत्र्यापासूनच संभ्रमात आहे. काँग्रेसच्या काळात देशातील जनता ही नाराज होती आणि आता ते पंतप्रधान मोदींवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
काँग्रेस गोंधळलेला पक्ष
ज्या काँग्रेसने देशाला कठीण परिस्थितीत ढकलले, तोच काँग्रेस पक्ष आज भाषणाद्वारे आमच्यावर टीका करत आहे. राष्ट्रीयीकरण करायचे की खासगीकरण हे ठरण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष आहे. जो काँग्रेस पक्ष 10 वर्षांत आपली अर्थव्यवस्था 12 व्या स्थानावरुन 11 व्या स्थानावर आणू शकला नाही, तो आज आमच्यावर टीका करत आहे. तोच काँग्रेस आम्हाला आर्थिक धोरणांबद्दल टोले लगावत आहे.
स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली?
आम्ही देशाला अनेक संकटातून बाहेर काढले आहे. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? तुमच्यावर ब्रिटीशांचा प्रभाव नव्हता तर तुम्ही आयपीसी का बदलला नाही? जर तुमच्यावर ब्रिटीशांचा प्रभाव नव्हता, तर मग देशाचा अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता मांडण्याची परंपरा का सुरु ठेवली? देशाच्या लष्करातील जवानांसाठी युद्ध स्मारक का बांधले नाही?