सोलापूर, 2 ऑगस्ट, (हिं.स.)। खासगी क्लास बुडू नयेत म्हणून हजारो विद्यार्थ्यांनी शहराकडे पाठ फिरवत ग्रामीणमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर आता विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन घालण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेणार आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व महाविद्यालयांची प्रवेश क्षमता व दिलेले प्रवेश, या बाबींची पडताळणी होणार आहे. डीएड, बीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने यंदा दहावीत ६५-७० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचीही पसंती विज्ञान शाखेला असल्याचे दिसून आले. मात्र, अलीकडे अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा आणि कॉलेजला नुसते परीक्षेपुरतेच जायचे व नियमित खासगी क्लासला उपस्थित राहायचे, असा नवा पॅटर्न सुरू झाला आहे.
कॉलेजमधील उपस्थिती कमी, पण खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी, अशी वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. नीट, जेईई, सीईटीच्या तयारीसाठी विज्ञान शाखेतील बहुतेक विद्यार्थी दररोज खासगी क्लासेसमध्ये उपस्थित राहातात.
सोलापूर शहर-जिल्ह्यात देखील अशीच स्थिती असून त्याच्या पडताळणीसाठी आता माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप टप्प्याटप्प्याने अचानकपणे जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. त्यावेळी अकरावी आणि बारावीच्या विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणार आहेत.