परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असल्याबाबतचे वृत्त समजले. त्यानंतर मुंबईवरून आपले दिवसभराचे कामकाज आटोपून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे महाशिवरात्रीसाठी परळीकडे निघाले होते. अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात येऊन बाधितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास कामकाज सुरू झाले होते. दिवसभर विविध शासकीय कामकाज, बीड रेल्वे संदर्भातील बैठक, त्याचबरोबर महा ऍग्रो ॲपचे अनावरण यांसह विविध शासकीय कामकाज आटोपून सायंकाळी धनंजय मुंडे हे महाशिवरात्री असल्याने परळीकडे निघाले होते.
मध्यरात्री 12 वाजण्याच्या आधी जाऊन शिवरात्रीनिमित्त परळी येथील प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घ्यायचे या हेतूने परळीच्या दिशेने निघाले असता धनंजय मुंडे यांना निरपणा गावातील काही जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त समजले. त्याबरोबर त्यांनी आपला ताफा अंबाजोगाईकडे वळवत आधी मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे समजले व दर्शन घेणे पुढे ढकलले.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे जाऊन निरपणा गावातील अन्नातून विष बाधा झालेल्या सर्वच रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना धीर दिला, तसेच त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या; तसेच सदर रुग्णांना भगरीतून विषबाधा झाली असल्याने याबाबत योग्य चौकशी करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी अन्न भेसळ व सुरक्षा अधिकारी श्री देवरे यांना दूरध्वनीवरून दिले. यावेळी स्वारातीचे डीन डॉ.धपाटे, डॉ. मोगरेकर, डॉ.चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, तानाजी देशमुख, विश्वंभर फड, रणजित चाचा लोमटे, अजित गरड यांसह आदी उपस्थित होते.
सर्वच रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टर योग्य ते उपचार करत असल्याचे अधिष्ठाता डॉ.मोगरेकर यांनी स्पष्ट केले आहे.