न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने चालवली तयारी
नवी दिल्ली, 05 ऑगस्ट (हिं.स.) : चिटफंड, लॉटरी अशा योजनांमध्ये पैसे गमावणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अशा घोटाळ्यांनंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पैसा जप्त करत असते. आता हे पैसे पीडितांना देण्यासाठी ईडी मोठी मोठी तयारी करत आहे.
काही दिवसापूर्वी एका घोटाळ्यात ईडीने कोलकाता येथून 12 कोटी रुपये जप्त केले होते, आता ही रक्कम पीडितांना मिळणार आहे. ही रक्कम कोलकात्याच्या रोझ व्हॅली ग्रुपच्या कंपन्यांमध्ये पैसा जमा करणाऱ्यांना 22 लाख पीडितांमध्ये वितरित करणार आहे. या कंपनीने ठेवीदारांना भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पीएमएलए न्यायालयाने 24 जुलै रोजी कोलकाता येथील ईडीला रोझ व्हॅली घोटाळ्यानंतर जप्त केलेली 11 कोटी 99 लाख रुपयांची रक्कम ‘ॲसेट डिस्पोजल कमिटी’कडे हस्तांतरित करण्यास सांगितले. ईडीने कंपनीच्या 14 मालमत्ता जप्त करून ही रक्कम वसूल केली आहे. न्यायालयाने ही रक्कम पीडित ग्राहकांना देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आता न्यायालयाच्या आदेशाची ईडी अंमलबजावणी करणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता पीडितांची रक्कम परत मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. ईडी देशभरातील घोटाळे आणि घोटाळे करणाऱ्यांकडून मिळालेला पैसा जप्त पीडितांना परत देणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये 2013 मध्ये झालेला रोझ व्हॅली घोटाळा हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. हा घोटाळा शारदा घोटाळ्यापेक्षाही मोठा होता,ईडीने दिलेल्या माहितीनुसार, भारतभरातील गुंतवणूकदारांकडून 17 हजार 520 कोटी रुपये गोळा केले. ऑल इंडिया स्मॉल डिपॉझिटर्स युनियनने ही रक्कम 40 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर काही अहवालांमध्ये ही रक्कम 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. रोझ व्हॅली घोटाळा प्रकरणी ईडी आणि बाजार नियामक सेबीही कारवाई करत आहे. या कंपनीने बेकायदेशीर योजनांद्वारे जनतेकडून जमा केलेला पैसा वसूल करण्यासाठी सेबी या कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव करत आहे.