देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक बोललो, फडतूस बोललो, पण आता माझ्याकडे शब्द उरले नाहीत. त्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का असं वाटतं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का असा प्रश्न निर्माण होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, असा प्रश्न विचारावासा वाटत आहे. कारण एक हत्या होत असताना त्याची बरोबरी श्वानासोबत केली जात आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रात सरकारच्या आशिर्वादाने गुंडगिरी चालू आहे. हे सरकारमधील गँगवॉर आहे. गुंडांचे मंत्र्यांसोबतचे फोटो आणि त्यांना दिलं जाणारं संरक्षण हा चिंतेचा विषय आहे. आमचा कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर याची हत्या झाली. ज्याने हत्या केली असं सांगितलं जातं, तो गुंड होता, नंतर त्याने आत्महत्या केली. सूडभावना टोकाची भावना असेल असं आपण मानू, पण त्याने आत्महत्या का केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ समोर आलाय, मॉरीस सोबतचा व्हिडिओ फेसबुक लाईव्हवर होता, पण अभिषेकला गोळ्या झाडताना दिसतंय पण कोणी गोळ्या घातल्या, याचा व्हिडिओ अजून समोर आलेला नाही. त्या मॉरीसने बॉडीगार्ड नेमला होता, अभिषेकवर गोळ्या कोणी चालवल्या, दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिलेली का हा प्रश्न उपस्थित होतो, असंही ठाकरे म्हणाले.