जयपूर, ४ऑगस्ट (हिं.स.) : राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये एक भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. सदर कुटूंब ऋषिकेशहून परत येत होते.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने कारला एक किलोमीटरपर्यंत खेचत नेले. कार दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे वर पुढे जात होती. त्यानंतर पाठीमागून येणारा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन कारला धडकला. अपघातानंतरही ट्रकचालकाने कार सुमारे एक किलोमीटरपर्यंत ओढूत नेली. यानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पळ काढला.
पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे मृतदेह चक्क अडकले होते. अशा स्थितीत मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. अपघाताचे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला.