मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याची भीती – शरद पवार
Fear Manipur like situation in Maharashtra Sharad
नवी मुंबई, २९ जुलै (हिं.स.) : एकसंध समाज, एकसंध राष्ट्र ही संकल्पना घेऊन आणि एकत्र येऊन काम करण्याची सध्या गरज आहे. मात्र मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते की काय, याची भीती वाटू लागली आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये रविवारी ऐक्य समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, रोहित पवार आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, मणिपूरमध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून दोन समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र आता ते एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. त्यांनी एकमेकांची घरे जाळली, शेती उद्ध्वस्त केली. मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे जाणे आवश्यक होते. मात्र ते तिथे गेलेच नाहीत. त्यामुळे परिस्थिती भयानक बनली.
मणिपूरसारखी स्थिती अनेक राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती वाटते. मात्र सुदैवाने महाराष्ट्राला युगपुरुषांचा वारसा आहे. या युगपुरुषांनी देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे फूट पाडणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पडला आहे. साडेतीनशे वर्षांमध्ये देशात अनेक राजे होऊन गेले. मात्र कर्तृत्ववान राजे म्हणून फक्त शिवाजी महाराजांचे नाव पुढे येते.
मोघलांचे आणि यादवांचे राज्य त्यांच्या स्वतःच्या नावाने ओळखले जाते. शिवाजी महाराजांचे राज्य मात्र रयतेचे राज्य असे संबोधले जाते. महाराष्ट्राला वैचारिक विचारांचा वारसा आहे. या देशात अनेक राजे होऊन गेले. दिल्ली मुघलांची होती, देवगिरी यादवांची होती, राजपूतांचं राज्य होतं, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं नव्हे तर हिंदवी आणि रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्याला दिले, असेही पवार यांनी सांगितले.