मराठा आरक्षण आणि सगे-सोयरे यांच्या नावासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा, असे आवाहन समाज बांधवांना केले आहे. दरम्यान रुग्णालयात दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मनोज जरांगे यांनी काल (रविवारी) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत वाद निर्माण केला. मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. फडणवीसांना मला मारायचं आहे. त्यामुळे मी सागर बंगल्यावर येतो. त्यांनी मला मारुन दाखवावं असं म्हणत ते मुंबईकडे कुणालाही न जुमानता निघाले होते. त्यानंतर विविध स्तरातून त्यांनी फडणवीसांच्या केलेल्या अपमानाचा निषेध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर येत अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाही. यासाठी त्यांनी आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार असल्याचे . यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केले. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.
अंबडमध्ये रविवारी रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या संचारावर निर्बंध आले. त्यानंतर सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. अखेर जरांगे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते. जरांगे यांनी १० फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस होता. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. येत्या काळात ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.