मुदखेड ता प्र
निवघा तालुका मुदखेड गावातील प्रमुख समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तसेच स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नसल्याने मरणानंतरही यातना सोसाव्या लागत असल्यामुळे गावकऱ्यांनी आता प्रमुख मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद व्यंकटराव पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटेल का याची आस गावकऱ्यांना लागली आहे. या गावात मराठा, बौद्ध, लिंगायत, मुस्लिम या समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मराठा व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीस जागा उपलब्ध असली तरी जाण्या येण्यासाठी रस्ताच नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्काराचा शेवटचा प्रवास सुद्धा चिखलातून होत आहे. यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधीनी टोलवाटोलवीच केलेली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर मुरूम टाकून थातुर मातुर डागडुजी केली जाते पुन्हा या प्रश्नाकडे ढुंकूनही बघितले जात नाही. यासोबतच लिंगायत व मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीच्या दफन विधीचा प्रश्न मोठा आहे. स्थानिक प्रशासनाकडे गावठाण जागा असूनही जागेचा प्रश्न सोडविला जात नाही याबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही गांभीर्याने घेतली जात नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गावातील विविध समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा या संदर्भात सन २०१८ मध्ये तहसीलदार यांना आदेश देऊन ग्रामस्थांचा प्रशांत भूमीचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात पत्र दिले होते परंतु यावर प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला नसून गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीच्या रस्त्याचा व जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे.
एक वर्षापूर्वी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण केले असता संबंधित प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी तोंडी व लेखी आश्वासन देऊन स्मशानभूमीचा रस्ता व जागेचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसून मृतदेहाची विटंबना सुरूच आहे. दफनविधी जागेच्या सुरक्षाu भिंतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद व्यंकटराव पवार यांनी ग्रामस्थांच्या एलगारातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आजचा चौथा दिवस असूनही संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी कुठलीही दखल घेतली नाही. मृतांच्या होणाऱ्या विटंबनेचा प्रवास केव्हा थांबणार हेच पहावे लागणार आहे.
प्रतिक्रिया- गावातील लिंगायत तसेच मुस्लिम समाजाच्या जागा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाच्या लोकांना आपापल्या सोयीनुसार दफनविधी क्रिया करावी लागते. मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी जागा नसल्याने त्यांचा प्रश्न एरणी आला आहे. मराठा व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात चिखलमय झाला असून अजूनही हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीच्या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू असून याबाबत तोडगा न निघाल्यास समाजाच्या हितासाठी प्राण त्याग करण्याची तयारी आहे. – प्रमोद पवार स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष ,मुदखेड
प्रतिक्रिया – विविध समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रमुख मागण्यासंदर्भात सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचा मजबुती करण्यासंदर्भात संबंधित गुत्तेदार यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याशिवाय प्रशासनाच्या वतीने स्थानिक प्रशासनास जागेचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे. -आनंद देऊळगावकर तहसीलदार, मुदखेड