गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.
तरुणांनी दिले ग्रामपंचायतला लेखी निवेदन
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी / प्रतिनिधी
विष्णु मगर
स्वच्छ भारत..स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते. गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे. मात्र जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न येरणीवर आला असल्याचे देळेगव्हाण येथील युवकांनी सरपंच व ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटलं आहे की गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बर्याच ठिकाणी गटारे तुंबल्याने परिसरातील रस्त्यांवरून दुर्गंधीयुक्त घाण पाणी ओसंडून वाहत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात स्वच्छ भारत अभियान तीनतेरा वाजलेले आहे.
गावात अनेक ठिकाणी व प्रमुख चौकातील भागात गटारे गेल्या अनेक दिवसांपासून तुंबली आहेत. विविध भागात अगोदरच दैनंदिन साफसफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना त्यात या गटारीच्या घाण पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे इतरांना स्वच्छतेचे शहाणपण शिकवणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयच्या दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. गावातली गल्लीतल्या रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.
गावातील प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावरच गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधीमुळे लहान मुले वयोवृद्ध व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक मात्र त्रासून गेले आहेत. येथील लोकप्रतिनिधी या विभागात फिरकत नसल्याने नागरिकांना याप्रती संताप व्यक्त होत आहे. समस्या काय आहेत हे जाणून घेण्याची कधी तसदी घेतलेली नाही.
लोकप्रतिनिधींकडून विकासाची अपेक्षा नसल्यामुळे नागरिकांना तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न पडत आहे. ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे गटारांमध्ये पाणी तुंबत आहे.
गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश गटारींचे बांधण्यात आलेली नाहीत. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. .
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केल्या, मात्र काही उपयोग नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
या तरुणांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने अती तातडीने गावातील ज्या स्वच्छता बाबतीत ज्या समस्या आहेत त्या तातडीने मिटवून साचलेल्या डबक्यात कच टाकून गावकऱ्यांना सहकार्य करावे अशी विनवणी निवेदनात केली आहे