हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने आश्चर्य व्यक्त केले असतानाच आता राजकारण वेगळ्या दिशेने वळले आहे. राज्यात काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य यांने मंत्रीपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
हिमाचलप्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात काँग्रेसच्या 6 आणि 3 अपक्ष अशा 9 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज उमेदवार अभिषेक मनु सिंघवींचा पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे 6 आमदार वीरभद्र सिंह यांच्या गटातील होते. तर भाजपमध्ये जाण्यापूर्वी हर्ष महाजन देखील वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खु गट आणि वीरभद्र सिंह यांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि धुसफूस सुरू झाली होती. त्यानंतर वीरभद्र सिंह यांचे सुपुत्र विक्रमादित्य यांनी राजीनामा देत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. राजीनाम्याच्या घोषणेनंतर विक्रमादित्य म्हणाले की, पक्षात आमदारांच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही. आमदारांच्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे. माझी निष्ठा पक्षाशी आहे, त्यामुळेच मी उघडपणे बोलत आहे. मी शिस्तप्रिय आहे, त्यामुळे मला जमेल तेवढे बोललो. पण हे सरकार बनवण्यात राज्यातील आमच्या तरुण मित्रांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो का ? आपण जे काही बोललो ते वेळेवर पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. नुसते आम्ही केले असे म्हणणे महत्त्वाचे नाही, सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे हे जनतेने पाहिले पाहिजे. ज्या प्रकारे घडामोडी घडल्या आहेत ते दुर्दैवी आहे. या सर्व गोष्टी पाहून मला वाईट वाटते. मी नेहमीच नेतृत्वाचा आदर केला आहे आणि सरकार चालवण्यात योगदान दिले आहे. काँग्रेस सरकारमधील मंत्री या नात्याने आम्ही आमच्या एक वर्षाच्या कार्यकाळात सरकारला जेवढे भक्कम पाठबळ दिले. परंतु, माझा देखील अनेकदा अपमान झाल्याचा आरोप विक्रमादित्य यांनी केलाय.