नागपूर, 15 ऑगस्ट (हिं.स.) : बांगलादेशातील हिंसाचार चिंताजनक असून तिथल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाला विनाकारण लक्ष्य बनवण्यात आल्याची खंत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होऊ नयेत याची काळजी घेणे ही आपल्या देशाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. नागपुरातील संघ मुख्यालयात स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, बांगलादेशात अनेक अत्याचार होत असून तेथे राहणाऱ्या हिंदू बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भारताची इतरांना मदत करण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत आपण अनुभवले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केलेला नाही. उलट, समोरचा कसेही वागत असला तरी आम्ही अडचणीत असलेल्या लोकांना मदतच करीत आलो आहोत. या परिस्थितीत आपल्या देशाच्या सुरक्षेसह इतर देशांनाही मदत करणे आवश्यक आहे. असे चढ-उतार सुरूच राहणार असल्याचे सरसंघचालक म्हणाले. भागवत यांच्या मते, अस्थिरता आणि अराजकतेमुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या देशाची जबाबदारी आहे. काही बाबींमध्ये सरकारला स्वतःच्या पातळीवर पाहावे लागते. पण सरकारला बळ तेव्हाच मिळते जेव्हा समाज आपली जबाबदारी पार पाडतो आणि देशाप्रती बांधिलकी दाखवतो असे भागवत यांनी सांगितले.