राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत आहेत. राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला पडला आहे. सत्ताधारी आमदार पोलीस ठाण्यात, गणेशोत्सव मिरवणुकीत गोळीबार करतात. मुख्यमंत्री यांच्या सोबत गुंडांचे फोटो समोर येतात. या सर्व घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज २८९ अनव्ये प्रस्ताव मांडत कायदा व सुव्यस्थेच्या गंभीर प्रश्नांबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.
मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर काही गुंड त्यांच्यासोबत फोटो काढतात. पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर सत्ताधारी आमदार त्याला हिंदू डॉनची पदवी देतात. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला जातो. गोळीबार झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या शहरप्रमुखाचे स्वागत केले जाते. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली जाते. या सर्व घटना पाहता राज्यात सामान्य माणूस सुरक्षित नसून गुंड सुरक्षित असल्याची भावना जनमानसात असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.
तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली.