मुंबई,२१ जुलै (हिं.स.) : भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर टीका करताना ती आता राजकीय बनत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जरांगेंना राजकारणातून बाजूला राहून मराठा समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.
दरेकर म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावर टीका करण्याचे काही कारण नाही. जरांगेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना, ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत आहेत पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत नाहीत. यामुळे त्यांची भूमिका राजकीय वाटते.
पुढे त्यांनी जरांगेंवर टीका करताना म्हटले की, “आपले लक्ष मराठा समाजाच्या प्रश्नांवर आहे की फक्त देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर?”दरेकरांनी सांगितले की, सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण मिळवण्याची हमी दिली आहे आणि सरकार यावर काम करत आहे. त्यांनी जरांगेंना राजकारण न करता, आंदोलनाची भूमिका नीट ठेवावी असे आवाहन केले.
दरेकरांनी स्पष्ट केले की, “आम्ही मराठा समाजाच्या तरुण-तरुणींसाठी काम करतोय. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सरकारकडे दूत म्हणून काम करू. परंतु, त्यांचा कुणी वापर करू नये, त्यांच्या मार्फत कुणाचा अजेंडा राबविला जाऊ नये, एवढेच म्हणणे असल्याचेही दरेकरांनी सांगितले.