रत्नागिरी, 15 जुलै, (हिं. स.) |कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रविवारी सायंकाळी दरड कोसळून विस्कळित झालेली रेल्वेची वाहतूक १६ तास उलटून गेल्यानंतरही सुरू झालेली नाही.
रायगड आणि रत्नागिरीमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वेच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा आला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
दिवाणखवटी बोगद्याच्या तोंडावर कोसळलेली दरड हटविण्याचे काम रविवारी तातडीने सुरू करण्यात आले असले तरी या कामात सतत सुरू असलेल्या पावसाचा व्यत्यय आला आहे. या दुर्घटनेमुळे कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या सेक्शनमध्ये जवळपास २५ गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांचा खोळंबा झाल्याने कोकण रेल्वेने रत्नागिरी, चिपळूण तसेच खेड येथे रेल्वे गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी बसेसची मदत घेतली आहे.
रविवारी सायंकाळी हे दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल्वेने पुढील तीन-साडेतीन तासांमध्ये मार्ग पूर्ववत करण्याचे काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे या कामात अडथळा आला आहे. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था केली. कोकण रेल्वेने देखील विविध स्थानकांवर खोळंबा झालेल्या प्रवाशांच्या जेवणखाण्याची व्यवस्था केली आहे.