तभा फ्लॅश न्यूज/जमीर काझी : मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला मोठी राजकीय किनार लाभली आहे. सत्तेची हंडी फोडण्यासाठी नेत्यांची धडपड आणि कार्यकर्त्यांची लगबगीमुळे मुंबई महानगरासह ठाणे, कल्याण नवी मुंबईत लाखोंच्या रक्कमेच्या हंडी लावण्यात आल्या होत्या.दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असताना नेत्यांनी राजकीय फटाकेबाजी करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष आणखी वाढविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिका निवडणुकीत परिवर्तनाची हंडी फोडणार, असा विश्वास व्यक्त करीत कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर घातली आहे.
भाजपाच्या वतीनं वरळी येथील जांबोरी मैदानात आयोजित परिवर्तन दहीहंडीसह वडाळा, घाटकोपर, बोरिवली येथे भाजपाच्या नेत्यांनी आयोजिलेल्या उत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन गोविदा व कार्यकर्त्याचा उत्साह वाढविला.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लावली जाईल. त्या विकासाच्या हंडीतलं लोणी जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,” असे सांगून ते म्हणाले,'”इतकी वर्ष लोणी कुठं जात होते, हे जनतेला सगळे माहिती आहे. सण, उत्सवांवरची सगळी बंधनं आधी एकनाथ शिंदे आणि आता मी हटवून टाकली. त्यामुळं गोविंदांचा उत्साह प्रचंड आहे. काल रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस होतोय. पण, गोविंदांच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
223 थरांची हंडी फोडली : शिंदे
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने 223 थरांची दहीहंडी फोडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकामध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकार बाजी मारणार असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या ते बोलत होते. नाव न घेता उद्धव ठाकरे गटावर कटोरी टीका केली.
मुंबई गुजराती माणसाच्या हाती जाऊ देणार नाही : संजय राऊत
मुंबईवर कब्जा मिळविण्यासाठी गुजरात व दिल्लीची मंडळी डोळा ठेवून आहेत, मात्र इथला मराठी माणूस ती गुजरात्यांच्या हाती जाऊ देणार नाही, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी भाजपा व शिंदे गटावर निशाणा साधला. उद्धव व राज ठाकरे हे मुंबई, ठाणे,कल्याण डोंबिवली, नाशिक महापालिका एकत्रित लढणार असल्याचा पुनरुचार केला.
सिलिब्रेटी रेलचेल
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रसिद्ध चित्रपट अभिनेते,सिनेतारका, आयटम गर्ल या दहीहंडी सोहळ्याच्या उपस्थिताच्या आकर्षणाचा भाग बनले होते. मुंबई, बोरिवली,ठाणे, कल्याण आदी ठिकाणी उत्सवाला अभिनेते सुनील शेट्टी चंकी पांडे, मृणालिनी, गौतमी पाटील आदींनी हजेरी लावीत, तर काहीनी आपल्या नृत्याविष्कार सादर करीत उपस्थिताचा जल्लोष वाढविला.
Post Views: 13