* माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली, २६ जुलै (हिं.स.) : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. परंतु या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलावर निर्णय करण्याचे निर्देश न्यायालयाने आज दिले आहेत. यामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
केदार यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात उपस्थित नसल्याने हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले होते. त्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या विनंतीवरून हे प्रकरण पुढे ढकलले आहे. मात्र त्यात सुनील केदार यांना कुठेही दिलासा मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे सुनील केदार हे आमदार म्हणून अपात्रच राहतील, असा निर्णय देण्यात आला होता. त्यानंतर स्वतःला मिळालेली शिक्षा स्थगित करून घेण्यासाठी आणि त्या आधारे आमदारकी बहाल करून घेण्यासाठी आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परिणामी त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी प्रक्रिया पार पडली.