छत्रपती शिवाजी शाळेचा उपक्रम ;
आषाढी एकादशी निमित्त
परतुरात चिमुकल्याची विठ्ठल गजर दिंडी
परतूर: प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शहर परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने सोमवारी छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार काळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या या उपक्रमामध्ये भागवताचार्य, रामायणाचार्य रूपालीताई सवणे व रामेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. विठ्ठल रुक्माई चे विधिवत पूजन यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यात्म व शिक्षण यांची जोड लावत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून त्यांनी श्लोक देखील म्हणवुन घेतले. आई-वडिलांना आदर देणे ,गुरुजनांना मान राखणे,आई-वडिलांच्या रोज पाया पडणे, असे एक नव्हे तर अनेक बाल संस्कार त्यांनी आपल्या वाणीतून मुलांवर केले. संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अभंग गवळण श्लोक पसायदान भक्ती गीते, असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका लंका भवर यांनी केले .तर सूत्रसंचालन श्याम चव्हाण यांनी केले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत वारकरी वेशभूषा धारण करून त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शालेय परिसराचे वातावरण यामुळे भक्तिमय झाले होते. फुगडी खेळून विद्यार्थ्यांनी या दिंडीचा आनंद लुटला. शाळेत साक्षात अलंकापुरी अर्थात पंढरपूर अवतीर्ण झाल्यासारखे वाटत होते. विद्यार्थ्यांच्या माऊली माऊलीच्या जय घोषामुळे चैतन्य उतरले होते. शेषनारायण बिल्लारे यांनी देखील वारीचे महत्त्व मुलांना सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम मगर, ज्योती खैरे, साधना पाईकराव, महानंदा व्यवहारे, पल्लवी चौकटे, यंदे, मीना मसलेकर, प्रवीण दवंडे, क्षीरसागर, किंगरे, मुंजा जाधव, सुरज पहाडे, कल्याण भवर आदींनी अथक परिश्रम घेतले.