टंचाईग्रस्त गावे, वाड्या आणि त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत अवघ्या महिनाभरात झालेली वाढ बघता नाशिक विभागात पाणीटंचाई वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.
नाशिक विभागात ४८५ गावे आणि वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईचे संकट भेडसावत असून, २ लाख ६५ हजार ६९१ नागरिकांना १४५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यापैकी ३८० इतकी सर्वाधिक टंचाइग्रस्त गावे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून, १ लाख ५९ हजार जणांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे.
विभागात डिसेंबर महिन्यात ४४० गावे आणि वाड्यांवर पाणीटंचाई होती. आता जानेवारीत हीच संख्या ४५ ने वाढून ४८५ वर पोहोचली आहे. टँकरची संख्याही महिनाभरात १२७ वरून १४५ वर पोहचली आहे.
पुरेसा पाऊस न झाल्याने ७९ गावे आणि ३०६ वाड्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या विळख्यात सापडल्या आहेत. बागलाण, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, सिन्नर, येवला, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि नगर जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी या ११ तालुक्यांतील गावांमध्ये दुष्काळ आहे. विभागात २१ शासकीय आणि १२४ खासगी टँकरद्वारे १७९ गावे आणि ३०६ वाड्यांवरील २ लाख ६२ हजार ६९१ नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ६१० नागरिकांचा समावेश आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून ७० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
तालुका—गावे व वाड्या— टँकर—लोकसंख्या
बागलाण—२२—१५—७,१४०
चांदवड—२८—११—२२,९४५
देवळा—३५—८—८,९४०
मालेगाव—२७—१५—२१,५८६
नांदगाव—१९९—३५—४५,०१९
सिन्नर—९—९—६,७५१
येवला—६०—२३—४७,२२९
शिंदखेडा—२०—१—४०,४५५
चाळीसगाव—१५—१६—३६,८८१
संगमनेर—११—३—५,२०७
पाथर्डी—५९—९—२०,५३८
एकूण—४८५—१४५—२,६२,६९१