विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेव्हा आंदोलन रोखण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सरन्यायमूर्तींना पाठवले आहे.
शेत मालाची किमान आधारभूत किंमतीसह (एमएसपी) इतर मागण्यासांठी उत्तर भारतातील विविध शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली आहे. त्यासाठी शेतकरी सध्या दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी राजधानीच्या सर्व सीमा बॅरिकेट्स, तारेचे काटेरी कुंपण लावून सील करण्यात आल्या आहेत. यामुळे दिल्लीतील दररोजच्या व्यवहारांवर परिणाम झाला असून शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष अदिश अग्गरवाला यांनी सरन्यायमूर्तींना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सुओमोटो याचिका दाखल करुन घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर, या पत्रातून असा आरोपही करण्यात आला आहे की, हा उपद्रव निर्माण करण्याचा आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न आहे. न्यायालयांसमोर वकिलांच्या अनुपस्थितीमुळे कोणताही प्रतिकूल आदेश देऊ नये, यासाठी न्यायालयांना निर्देश देण्याची विनंतीही या पत्रातून करण्यात आलीय.