नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) : आगामी 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प आम्ही घेतला असून कुठल्याही परिस्थितीत तो पूर्णत्वास नेऊ असा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी देशाला संबोधित करताना केला. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या अगणित स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या चिंतेत भर पडली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपले कुटुंबीय गमावले; राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. त्या सर्वांप्रती सहानुभूती व्यक्त करतो आणि खात्री देतो की, या संकटाच्या वेळी हे राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. वर्तमानात आपली लोकसंख्या 140 कोटी असून जर आपण संकल्प केला आणि एकत्रितपणे वाटचाल केली तर, सर्व अडथळे पार करत 2047 पर्यंत नक्कीच विकसित भारत बनवू शकतो, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी संबोधनाच्या सुरुवातीला केला. एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान द्यायला तयार होते. परंतु, आजचा काळ देशासाठी जगण्याचा आहे. देशासाठी बलिदान देण्याची तयारी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर देशासाठी जगण्याचा संकल्प भारताला समृद्ध करू शकतो. नेशन फर्स्टच्या संकल्पाने आम्ही प्रेरित आहोत. ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र आम्ही दिला. मला आनंद होत आहे की, व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. आमच्या सुधारणांची बांधिलकी 4 दिवसांच्या टाळ्यांसाठी नाही, आमच्या सुधारणांची प्रक्रिया कोणत्याही जबरदस्तीमुळे घडून आलेली नाही, तर ती देशाला मजबूत करण्याची आहे. आम्ही राजकीय दबावामुळे कोणताही निर्णय घेत नाही, आम्ही राजकीय गणितांनुसार निर्णय घेत नाही. आमचा एकच संकल्प आहे की, प्रथम राष्ट्रहित, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारतात यापूर्वी सरकार म्हणजे मायबाप अशी संकल्पना होती, नागरिकांना कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे हात पसरावे लागायचे. एखाद्या गोष्टीसाठी विनंती किंवा शिफारस करावी लागत असे. मात्र, आमच्या सरकारने प्रशासनाचे हे मॉडेल बदलले. आज प्रशासन वीज, पाणी, गॅस आणि इतर सुविधा स्वत: नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे, नागरिकांना सरकारकडे यावे लागत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या काळातील सरकारी योजनांचा आणि सुधारणांची माहिती दिली. पूर्वीच्या काळातील काँग्रेसशासित राजवटीच्या काळातील त्रुटींचा उल्लेख त्यांनी केला. अनेक दशके भारत देश ‘होता है, चलता है’, अशा वृत्तीने चालत होता. नवीन काही करायला गेले तर वाद होतील, अशी भीती अनेकांना वाटत होती. जितक्या गोष्टी आहेत, त्यामध्ये संतुष्ट राहा, अशी वृत्ती समाजात होती. देशात काही होणार नाही, परिस्थिती कधीच बदलणार नाही, अशी लोकांची मानसिकता होती. आमच्या सरकारने ही मानसिकता तोडण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. यापूर्वी पुढच्या पिढीसाठी आम्ही आतापासून काम का करायचे, अशा वृत्तीने राज्यकर्ते वागत होते. त्यावेळी तरुणांच्या अपेक्षांचा विचार झाला नाही. त्यामुळे तरुण हे संधी आणि सुधारणांच्या प्रतीक्षेत होते. आमच्या हातात सरकारची जबाबदारी आल्यावर आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. शहरी, मध्यमवर्ग, वंचित आणि तरुणांसाठी आमच्या सरकारने अनेक सुधारण केल्या. आम्ही या सुधारणा केवळ वाहवा मिळवण्यासाठी किंवा राजकीय नाईलाजापोटी करत नाही तर आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी निक्षून सांगितले. आमच्या सुधारणांचा मार्ग हा विकासाचा राजमार्ग आहे. या सुधारणा फक्त उच्चशिक्षीत किंवा बुद्धिवादी वर्गासाठी सीमित नाहीत. आम्ही राजकीय समीकरणांचा विचार करुन कोणत्याही सुधारणा राबवत नाही अथवा धोरणे ठरवत नाही. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट हीच प्राथमिकता आहे. आमचा भारत महान व्हावा, हाच संकल्प मनात ठेवून आम्ही प्रत्येक पाऊल उचलतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांसंदर्भातही भाष्य केले. बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित व्हायला हवी. भारताला शेजारील देशांमध्ये शांतता हवी आहे. बांगलादेशमध्ये जे घडले ते अतिशय चिंताजनक असल्याचे मोदी म्हणाले. बांगलादेशातील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होईल अशी आशा आहे. अंतरिम सरकार तेथील हिंदू आणि अल्पसंख्यक समाजाची सुरक्षितता सुनिश्चित करेल. तसेच, आगामी काळातही बांगलादेशच्या विकासाच्या प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा कायम राहतील असे मोदी यांनी अधोरेखित केले.